खेळ आणि फिक्सिंग कायम एकमेकासोब असणारे समीकरण आहे. प्रत्येक खेळात फिक्सिंग होतच असते. काहीशा प्रलोभनाला बळी पडून खेळाडू खेळाप्रती आपली असलेली निष्ठा विकून टाकतात. डब्ल्यूडब्ल्यूई व बास्केटबॉल लीगमध्ये सामनानिश्चितीचे अनेक प्रकार घडले. क्रिकेटमध्ये १९९९ ला तर सामना निश्चितीच्या प्रकरणामुळे भूकंप आला. मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, हॅन्सी क्रोनिए यांसारखे दिग्गज या प्रकरणामुळे क्षणात हिरोचे झिरो झाले. पण, २०१० मध्ये स्पॉट फिक्सिंग हा नवीनच प्रकार क्रिकेट जगताला समजला आणि खळबळ माजली.
पाकिस्तान क्रिकेट संघ २०१० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने दौऱ्याची सुरुवात झाली. पहिले दोन सामने इंग्लंडने आरामात जिंकले तर तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने पलटवार करत विजय प्राप्त केला व ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणारी चौथी कसोटी प्रतिष्ठेची बनवली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना जोनाथन ट्रॉटच्या शतकाच्या बळावर ४४६ धावा बनवल्या. पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने सहा बळी आपल्या नावे केले होते. सामन्याच्या पहिल्या दिवशी आमीरने दोन तर वरिष्ठ सहकारी मोहम्मद आसिफने एक नोबॉल टाकला होता. पण कोणाला पुसटशी कल्पना नव्हती की हे तीन नोबॉल सारे क्रीडाविश्व हादरवून ठेवणार आहे.
चौथ्या कसोटीच्या तिसर्या दिवशी ब्रिटीश वृत्तपत्र ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ ने काही पाकिस्तानी खेळाडूंनी सट्टेबाजांशी संबंधित एजंटद्वारे १५०,००० पाउंडची लाच स्वीकारल्याचा आरोप केला. चौथ्या कसोटी दरम्यान दोन पाकिस्तानी गोलंदाज जाणीवपूर्वक, खेळाच्या विशिष्ट टप्प्यावर नोबॉल टाकतील अशा प्रस्तावाचा हा आरोप होता.
न्यूज ऑफ वर्ल्डने दाखवलेल्या व्हिडिओमध्ये सट्टेबाज माजिद मजहर, पैसे मोजताना “मोहम्मद आमीर तिसऱ्या षटकात नोबॉल टाकणार आहे” असे बोलताना दिसत होता. सामन्याची चित्रफीत पाहिली गेली असता, आमीरने तिसऱ्या षटकात नोबॉल टाकल्याचे दिसून आले. आमीरने जवळपास अर्धा फूट पुढे जाऊन हा चेंडू टाकला होता. माजिदच्या व्हिडिओमध्ये, “मोहम्मद आसिफ हा दहाव्या षटकातील अखेरचा चेंडू नोबॉल टाकेल” असे म्हणताना दिसला आणि सामन्यात देखील दहावे षटक टाकताना आसिफने नोबॉल टाकला.
न्यूज ऑफ वर्ल्डने केलेले आरोप आणि व्हिडीओच्या आधारे, स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी २९ ऑगस्टला संध्याकाळी जाहीर केले की, त्यांनी सट्टेबाजी व फसवणुकीच्या आरोपावरून माजिदला अटक केली आहे. कसोटी सामना संपल्यानंतर, मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली आणखी तीन जणांना अटक केली गेली. ज्या दोन पुरुष व एका अज्ञात महिलेचा समावेश होता. तसेच, तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी आसिफ, अमीर आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान बट यांचे मोबाईलही ताब्यात घेतले. पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक याव्हार सईद यांनी पुढील वनडे व टी२० मालिकेच्या अनुषंगाने, सलमान बटला कर्णधार पदाचा राजीनामा देण्यास सांगितले.
तिन्ही खेळाडूंना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर आरोप निश्चिती केली. सर्व प्रकरणाचा सूत्रधार सलमान बट हा होता. कर्णधाराने आसिफ व आमिर यांना पैशाचे आमिष दाखवून स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. वर्षभर प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर नोव्हेंबर २०११ मध्ये तिघांनाही सट्टेबाजीच्या प्रकरणात लंडन न्यायालयाने दोषी ठरवले.
केवळ १८ वर्षाचा असल्याने मोहम्मद आमीरला पाच वर्ष तर मोहम्मद आसिफला सात वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले. हा संपूर्ण कट रचलेला कर्णधार सलमान बट याला ३० महिन्याचा तुरुंगवास तर १० वर्ष क्रिकेटमधून निलंबन अशा प्रकारची सजा सुनावण्यात आली.
२०१५ मध्ये तीनही खेळाडूंना खेळण्याची मुभा देण्यात आली. युवा आमीरने ज्या लॉर्ड्स कसोटीत चूक केली होती त्याच लॉर्डसवरून पुनरागमन केले. २०१६ टी२० विश्वचषक, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी व २०१९ एकदिवसीय विश्वचषक गाजवला. सध्या तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहे.
दुसरा वेगवान गोलंदाज आसिफ ३८ वर्षाचा झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा खेळण्याची त्याची इच्छा नाही. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत असला तरी आपण केलेल्या चुकीची त्याला जाणीव झालेली आहे.
सर्व प्रकरणाचा सूत्रधार सलमान बटने निलंबनानंतर घरगुती क्रिकेटमध्ये बऱ्याच धावा काढल्या आहेत तरी तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
क्रिकेटसाठी वेडे असणाऱ्या देशात, जेथे क्रिकेटपटूंना देवासमान दर्जा दिला जातो तेथे चाहत्यांची या खेळाडूंनी अशाप्रकारे फसवणूक केली ज्यातून अजूनही पाकिस्तान क्रिकेट पूर्णपणे बाहेर आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: धारदार यॉर्करने भल्याभल्यांची भंबेरी उडवणारा लसिथ मलिंगा
टेलरच्या दुकानात कामाला, पुढे रिक्षाचालक ते जगातील स्टार फलंदाज असा प्रवास करणारा तो