भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आज(15 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत निवृत्तीची निवृत्तीची घोषणा केली.
भारताचा यष्टीरक्षक कर्णधार एमएस धोनीचे आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. त्याच्या भविष्याबद्दल सौरव गांगुलीपासून सर्वांना प्रश्न विचारण्यात येत होते. यामध्ये अनेकांनी धोनीने नेतृत्वाचा निर्णय स्वत: घ्यावा असे म्हटले होते. तर काहींनी आता धोनीने निवृत्त व्हायला हवे असे म्हटले आहे. अखेर आज धोनीने निवृत्ती घेत या चर्चेला विश्राम दिला.
तसेच धोनी जूलै २०१९ पासून स्पर्धांत्मक क्रिकेट अजून खेळलेला नाही. तो शेवटचा सामना २०१९ विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध ८ जूलैला उपांत्य फेरीत खेळलेला आहे. त्यानंतर तो भारताकडून एकही सामना खेळला नाही. अखेर २०१९ विश्वचषकातील उपांत्य सामनाच धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
धोनीने निवृत्तीचा विचार का केला असावा या कारणांचा या लेखात आढावा घेतला आहे.
१. धोनीची कामगिरी –
धोनीने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत चांगली कामगिरी केली आहे. पण त्याच्या आधीच्या कामगिरीचा आणि आत्ताच्या कामगिरीची तुलना करता नक्कीच त्याच्या आत्ताच्या कामगिरीचा आलेख उतरता आहे. धोनीला मागील काही वर्षांत योग्यवेळी धावांची गती वाढवण्यात अपयश आले आहे.
त्याने कसोटीत याआधीच निवृत्ती घेतली होती. तो २०१५ पासून केवळ मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत होता. त्यामुळे त्याची २०१६ च्या आधीच्या कामगिरीची आणि त्यानंतरची कामगिरी लक्षात घेतली तर लक्षात येईल की २०१६ च्या आधी धोनीचा वनडेतील स्ट्राईक रेट ८८.८० एवढा होता. या स्ट्राईक रेटने त्याने २८३ सामन्यात ९११० धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या ९ शतकांचा आणि ६१ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याची सरासरी ५०.८९ एवढी होती.
तसेच २०१७ नंतरची त्याची कामगिरी पाहिली तर वनडेत त्याने ६७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४८.९१ च्या सरासरीने १६६३ धावा केल्या आहेत. तसेच यामध्ये त्याच्या केवळ १ शतकाचा आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच या धावा त्याने ८१.३६ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. यावरुन धोनीची कामगिरी खालावलेली दिसून येते.
२. नव्या दमाच्या खेळाडूंना मिळायला हवी संधी –
सध्या यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रिषभ पंत, संजू सॅमसन, केएल राहुल, केएस भरत, इशान किशन सज्ज आहेत. त्यांना आत्ता जर संधी दिली तरच ते पुढील काही वर्षांसाठी भारतीय संघाकडून मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी तयार होऊ शकतात.
धोनीला अनुभव आहे, ज्याचा फायदा भारतीय संघाला होतो. पण अनुभव महत्त्वाचा असला तरी नव्या दमाच्या खेळाडूंनाही संधी देणेही आवश्यक आहे. त्यांना आत्ता संधी दिली नाही तर त्यांच्या हातातून त्यांचा वेळ निघून जाईल. तसेच त्यांना संधी मिळाली तरच त्यांचाही अनुभव वाढणार आहे. भारताला पुढील भविष्यातील एक मजूबुत संघ तयार करायचा असेल तर आत्तातरी त्यांना युवा खेळाडूंना संधी द्यावी लागेल. या कारणामुळेही धोनीने निवृत्तीचा विचार केला असावा.
३. जवळपास १ वर्षापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब –
धोनीने जूलै २०१९ मध्ये शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळला आहे. त्यामुळे आता जवळपास दीडवर्ष धोनी क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे जरी आत्ता त्याला भारतीय संघात घ्यायचा निर्णय झाला असता तरी त्याला आधी त्याच्या स्वत:ला सिद्ध करावे लागले असते.
तसेच धोनी कर्णधार असताना त्यानेही अनेकदा काही कठीण निर्णय घेतले होते. त्याचबरोबर आता तोही अशाच ठिकणी उभा होता जेथून त्याला निवृत्तीचा निर्णय घेऊन युवा खेळाडूंना संधी द्यावी लागणार होती.
जरी धोनीचा अनुभव आणि त्याने संघासाठी दिलेले मोठे योगदान लक्षात घेता त्याला येत्या मालिकांसाठी भारतीय संघात संधी दिली असती तर आत्तापर्यंत मागील १ वर्षापासून भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थिरावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या रिषभ पंत, संजू सॅमसन, केएल राहुल अशा खेळाडूंवर अन्याय करण्यासारखे झाले असते. तसेच मागील वर्षभरापासून भारतीय संघाने या खेळाडूंसह जो समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे, तो समतोल धोनी अचानक वर्षभराने संघात आल्यानंतर कोलमडू शकला असता.
४. आता मिळवण्यासारखे काही राहिलेले नव्हते –
धोनीने आत्तापर्यंत एक खेळाडू ते कर्णधार आणि एक दिग्गज क्रिकेटपटूपर्यंतचा लांबचा पल्ला गाठला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये जितके यश कोणत्याच क्रिकेटपटूला, कर्णधाराला मिळाले नाही तेवढे यश धोनीच्या वाटेला आले आहे. त्याने जवळजवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व महत्त्वाची शिखरे पार केली आहेत.
तो एक फलंदाज म्हणून पदार्पणानंतर केवळ ४२ डावानंतरच तो आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता. पदार्पणानंतर एवढ्या लवकर क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणारा तो पहिलाच खेळाडू.
विशेष म्हणजे धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून आयपीएल स्पर्धेत अजून २-३ हंगाम तर आरामात खेळू शकतो. तेथे क्रिकेट खेळताना भारतीय संघाचे कोणतेही नुकसान होणार नाही.
तसेच त्याला ३ वर्षातच भारताच्या नेतृत्वाचीही जबाबदारी मिळाली होती. विशेष म्हणजे ही जबाबदारी त्याने उत्तम प्रकारे सांभाळताना २००७ साली टी२० विश्वचषक, २०११ साली क्रिकेट विश्वचषक, २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धा जिंकली. आयसीसीच्या या तीन मुख्य स्पर्धा जिंकणाराही तो एकमेव कर्णधार आहे. एवढेच नाही तर त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावरही होता. त्यामुळे धोनीने आत्तापर्यंत एखाद्या क्रिकेटपटू त्याच्या कारकिर्दीत जे यश मिळवण्याचे स्वप्न पहातो, ते सर्व अनुभवले आहे. त्यामुळेही त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असावा.