भारत हा क्रिकेटप्रेमी लोकांनी भरलेला देश आहे. इथे क्रिकेटला मंदिर आणि क्रिकेटपटूंना देवता समजले जाते, इतका क्रिकेटचा बोलबाला आहे. क्रिकेटविश्वातील अनेक महान क्रिकेटपटूंच्या गर्दीतही अधिकतर भारतीय चाहत्यांच्या मनावर भारतीय क्रिकेटपटूच राज करतात.
पण, २ दशकांपुर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी स्वत: भारतीय चाहते म्हणत असायचे की, ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा मैदानावर उतरायचा तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज एखाद्या वाघाप्रमाणे भासायची. त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास, त्यांची चपळता आणि त्यांच्या फिटनेसचा वेगळाच दबदबा असायचा. त्यांच्या तुलनेत भारतीय क्रिकेटपटूंना खूप ढिले ढाले म्हटले जायचे. पण, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
केवळ भारतीय चाहत्यांमध्ये नव्हे तर क्रिकेटविश्वातील इतर संघातील खेळाडूंमध्येही भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा आहे. त्यांच्या विक्रमाची, त्यांच्या फिटनेस, आत्मविश्वास आणि चपळतेची सर्वत्र वाहवाह होते. पण, नक्की कोणती अशी गोष्ट आहे, ज्यामुळे भारतीय संघाच्या प्रदर्शनात एवढी सुधारणा झाली आहे.
जेव्हा आपण चांगले प्रदर्शन करु लागतो, तेव्हा आपोआप स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या आत्मविश्वासाचे परिणाम असे झाले की, भारतीय संघाने केवळ मायदेशात नव्हे तर परदेशातही जाऊन विजयाचे झेंडे रोवले. हळूहळू भारतीय संघाने क्रिकेटविश्वात आपला धाक निर्माण केला. आता भारतीय संघातील खेळाडूंमध्ये मोठ्यात मोठ्या संघाचा सामना करण्याची क्षमता आहे.
या लेखात, आम्ही तुम्हाला ती पाच कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे भारतीय संघ इतके दमदार प्रदर्शन करत आहे आणि क्रिकेटविश्वात आपला दबदबा निर्माण करत आहे. 5 Reasons Due To Which Indian Team Dominate In The World
१. देशांतर्गत क्रिकेटचे महत्त्वपूर्ण योगदान –
क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गज भारतीय देशांतर्गत क्रिकेटची प्रशंसा करतात. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटवर खूप पैसा खर्च करतो. कारण, अनेक खेळाडू आपल्या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत करत असतात. भारतात देशांतर्गत पातळीवर अनेक टूर्नामेंट होतात.
जे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करतात, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळण्याच्या शक्यता वाढतात. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्येही कट्टर प्रतिस्पर्धा पाहायला मिळते. त्यामुळे त्याच खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळते, ज्यांच्यामध्ये कसलाही दबाव झेलण्याची आणि दमदार प्रदर्शन करण्याची क्षमता असते. या कारणामुळेच देशांतर्गत क्रिकेट भारतीय क्रिकेटच्या उदयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
२. कसोटी आणि वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावल्यामुळे वाढले भारताचे वर्चस्व –
९०च्या दशकापासून भारतीय क्रिकेट संघाची ओळख बदलायला सुरुवात झाली. भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तसेच वनडे क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले. टी२० क्रमवारीतही भारतीय संघ आपला दबदबा दाखवायला मागे पडली नाही. आता भारतीय संघ मायदेशात असो वा परदेशात असो सर्वत्र होणाऱ्या सामन्यात दमदार प्रदर्शन करताना दिसतो.
या यशाचा परिणाम भारतीय खेळाडूंच्या आत्मविश्वासावर होतो. कारण, जेवढे चांगले यश मिळते, तेवढाच खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. आज भारतीय संघातील अनेक खेळाडूंना जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. यात विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह अशा अनेक खेळाडूंचा समावेश होतो.
३. अडीच दशकात दोन विश्वचषक जिंकले –
१९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा वनडे विश्वचषक पटकावला. त्यामुळे क्रिकेटने भारतीय लोकांच्या मनात घर करायला सुरुवात केली. त्यानंतर दूसरा वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला २ दशके वाट पाहावी लागली. पण, २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०११ मध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली दूसरा वनडे विश्वचषक पटकावला.
दरम्यान २००७मध्ये भारताने जिंकलेल्या टी२० विश्वचषकामुळे लोकांमध्ये क्रिकेटचे वेड वाढले. अशा शानदार विजयांसोबत बरीच वर्षे भारतीय संघ कसोटी आणि वनडे क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर टिकून राहिला. त्यामुळे भारतीय संघाला क्रिकेटविश्वात वेगळी ओळख मिळाली.
४. आयपीएलने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरा –
आपणा सर्वांना माहीती आहे की, २००८ मध्ये भारतात सुरु झालेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) भारतीय क्रिकेटची सर्वात मोठी गेम चेंजर ठरली. यामुळे भारतीय क्रिकेट संघात दोन बदल घडले. एक म्हणजे, भारतीय क्रिकेटपटू अजून जास्त फिट बनले. दूसरा म्हणजे, भारतीय क्रिकेटपटूंना चिक्कार पैसा मिळायला सुरुवात झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसह आयपीएलमध्येही सलग भारतीय क्रिकेटपटू खेळू लागले. स्वत:च्या फिटनेस, प्रदर्शन, चुकांवर जास्त लक्ष देऊ लागले. आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली. जर एखाद्या हंगामात क्रिकेटपटू चांगला कामगिरी करु शकला नाही की, पुढील हंगामात त्याच्या ठिकाणी दूसरा दमदार क्रिकेटपटू संघात घेतला जातो. त्यामुळे क्रिकेटपटू आपले उत्तमोत्तम देण्यासाठी झटू लागले. या सर्वांमुळे भारतीय क्रिकेटची प्रसिद्धी नव्या पातळीवर पोहोचली.
५. फिटनेसच्या बाबतीतही भारतीय क्रिकेटपटू पुढे –
२ दशकांपुर्वी जे भारतीय क्रिकेटपटू होते, ते स्वत:च्या फिटनेसवर जास्त लक्ष देत नसायचे. कारण, त्यावेळी भारतात जास्त चांगले जीम, फिटनेससाठी लागणारे साहित्य आणि ट्रेनर उपलब्ध नव्हते. परंतु, मॉडर्न क्रिकेटपटू देशांतर्गत स्तरापासूनच स्वत:च्या फिटनेसला खूप जपतात.
कारण, कोणत्याही खेळात फिटनेसचे महत्त्व अनन्यसाधारण असते. भारतीय क्रिकेटपटू कित्येक तास सलग फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याची क्षमता बाळगतात. यामध्ये त्यांच्या तंदुरुस्तीचा मोठा हात आहे. म्हणून भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या दमदार प्रदर्शनाने क्रिकेटविश्वात आपला धाक निर्माण करु लागले आहेत.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: या ५ कारणांमुळे केएल राहुल कर्णधार म्हणून होऊ शकतो यशस्वी
कोण होणार कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० चा किंग?
वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे २ संघ
महत्त्वाच्या बातम्या –
‘सीपीएलमधून येणाऱ्या खेळाडूंना होणार आयपीएलमध्ये फायदा,’ विश्वविजेत्या खेळाडूने केले वक्तव्य
भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटरची तब्येत नाजूक, आहे व्हेंटिलेटरवर सपोर्टवर
टी२० क्रिकेटमध्ये रचला गेला इतिहास, ४ चेंडूवर ४ विकेट्स घेताना गोलंदाजाने दिली केवळ १ धाव