-सागर कबीर
भारतीय क्रिकेट संघाला ५० षटकांच्या २००७ क्रिकेट विश्वचषकात पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. भारतीय संघासाठी हा खूपच निराशाजनक काळ होता. तेव्हा बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि इरफान पठाण यांना सक्तीची विश्रांती देण्यात आली.
प्रशिक्षक ग्रेग चॅपेलचे बड्या खेळाडूंसोबत वाद होतं होते. चॅपेलने सचिनच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे सचिनच्या डोक्यात निवृत्तीचे विचार घोंगावू लागले. यासर्व विवादानंतर चॅपेलची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
भारतीय संघाला निराशेच्या या काळात एका सुपरस्टारची आवश्यकता होती. जो संघात नवीन ऊर्जा भरेल आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवेल. टी२० विश्वचषकासाठी कर्णधार पदाची जबाबदारी धोनीकडे सोपवली आणि भारतीय क्रिकेटचे भवितव्य बदलले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ चा टी२० विश्वचषक जिंकला. पण खूप कमी लोक जाणतात कि सचिनव्यतिरीक्त आणखी एका दिग्गज खेळाडूचा धोनीला कर्णधार बनवण्यात हात होता ते नाव आहे राहुल द्रविड.
सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली २००७ च्या टी२० विश्वचषकात खेळण्यास उत्सुक होते. पण त्यावेळचा एकदिवसीय व कसोटी संघाचा कर्णधार राहुल द्रविडने सिनियर खेळाडूंसोबत चर्चा केली. रोहित शर्मा, गौतम गंभीर यासारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यास सांगितले. निवडसमितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत झालेल्या वादानंतर द्रविडने कर्णधारपद सोडले. त्यावेळचे बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला कर्णधारपदाबाबत विचारणा केली असता सचिनने धोनीचे नाव सुचवले. राहुल द्रविडला विचारले असता त्यानेही धोनीचे नाव पुढे केले.
धोनीला कर्णधार करणे हा भारतीय क्रिकेट इतिहासातील महत्त्वाचा क्षण होता. यातील राहुल द्रविडचे योगदान विसरता येणार नाही.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे दैदीप्यमान यश
धोनीची सुरूवातीपासून एक वेगळी ओळख आहे. संघात आल्यावर धोनीच्या लांब आकर्षक केसांनी लोकांना वेड लावले. तडाखेबंद फलंदाजीने जगभरातील चाहत्यांना प्रभावित केले. कर्णधार झाल्यानंतर धोनीने चतुर रणनिती आणि कॅप्टन कुल नेतृत्वाने भारतीय संघाला नव्या ऊंचीवर घेऊन गेला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २ विश्वचषक, १ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०० एकदिवसीय लढतींपैकी ११० मध्ये विजय मिळवला आहे.