नवी दिल्ली । बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल जोहरी यांचा असा विश्वास आहे की, आयपीएलचे आयोजन मान्सून संपल्यानंतर केले जाऊ शकते. जोहरी यांनी अपेक्षा व्यक्त केली की, आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूदेखील खेळू शकतात.
खरंतर आयपीएलचे (IPL) आयोजन २९ मार्चला होणार होते. परंतु कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आले आहे. तसं पाहिलं तर आयपीएलचे आयोजन आता टी२० विश्वचषकावर अवलंबून आहे. कारण जर, ऑक्टोबर महिन्यात होणारा टी२० विश्वचषक स्थगित झाला तर आयपीएलचे आयोजन होऊ शकते.
राहुल जोहरी यांचे स्पष्टीकरण-
“आम्ही सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करणार आहोत. आमची अनेक एजन्सीबरोबर चर्चा सुरु आहे. जेव्हा लॉकडाऊन संपेल, तेव्हा त्यानंतर मान्सून सुरु होईल. त्यावेळी क्रिकेटच्या सर्व स्पर्धा मान्सून संपल्यानंतरच सुरु होतील. आशा आहे की, तेव्हापर्यंत परिस्थितीत सुधारणा होईल,” असेही टीसीएम स्पोर्ट्स हडल वेबिनारमध्ये सीईओ जोहरी म्हणाले.
“आयपीएल भारतात खूप प्रसिद्ध आहे. तरी याच्या आयोजनाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु करणार आहोत. आयपीएलच्या प्रेक्षकांची संख्या दरवर्षी वाढते. ज्या कंपन्या स्पाॅन्सरशीप देतात त्यांच्यासाठी क्रिकेट हा सर्वात मोठा प्लॅटफाॅर्म आहे. आयपीएलमधील रोमांचक बाब म्हणजे, येथे जगभरातील सर्वोत्तम खेळाडू खेळतात. तसेच आम्ही हे असेच कायम ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. परंतु हे एक-एक पाऊल पुढे टाकले तरच शक्य होईल. आम्हाला केवळ मान्सूनपर्यंत परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
जोहरी यांच्या वक्तव्यापूर्वी एक बातमी आली होती, त्यानुसार “२५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबरदरम्यान आयपीएलचे आयोजन करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे.”
यासंदर्भात एका फ्रंचायझीच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले की, ते लोक पुढील रणनीतीवर काम करत आहेत. तसेच आयपीएलच्या आयोजनाबद्दल त्यांचे असे मत आहे की, सप्टेंबर महिन्याच्या शेवटीपासून ते नोव्हेंबरदरम्यान केले जाऊ शकते. कारण आयपीएलचे आयोजन करायचे असेल तर एक महिन्याची योजना असायला पाहिजे. या योजनेमध्ये परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूचे वनडे द्विशतकाचे स्वप्न भंगले होते सचिन तेंडूलकरमुळे
-क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! आयपीएलचे आयोजन होणार या दिवसापासून
-सचिनने एकेकाळी धुव्वादार फलंदाजी केलेले स्टेडियम झाले क्वारंटाईन सेंटर