काही दिवसांपुर्वी आपण फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११ पाहिली. ज्यांनी पाहिली नाही त्यांच्यासाठी लेखाच्या शेवटी लिंक दिली आहे. या लेखात आपण फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची कसोटी ड्रीम ११ पाहणार आहोत.
या संघात आपण जे खेळाडू महाराष्ट्रात राहतात व मुंबई, महाराष्ट्र किंवा विदर्भाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत त्याचबरोबर भारताकडून त्यांनी क्रिकेट खेळले आहे, अशा खेळाडूंचा समावेश करणार आहोत.
असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट खेळलं आहे परंतु त्यांना भारताकडून कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या खेळाडूंचा यात समावेश केला नाही. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर दिनकर बळवंत देवधर अर्थात डीबी देवधर किंवा अमोल मुझूमदार या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
दुसरं म्हणजे हा संघ निवडताना त्या खेळाडूची त्या कसोटी कारकिर्दीतील संपुर्ण कामगिरी विचारात घेतली आहेच परंतु याचबरोबर फलंदाजी किंवा गोलंदाजीतील विशिष्ट क्रमवारीवरील कामगिरीही ध्यानात घेतली आहे. त्यामुळे काही चांगली कसोटी कारकिर्द असलेले महाराष्ट्रायीन खेळाडू या संघात स्थान मिळवु शकले नाहीत.
चला तर पाहुया फक्त महाराष्ट्रायीन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची कसोटी ड्रीम ११
१. सुनिल गावसकर (कर्णधार)
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येताना पहिल्या क्रमांकावरच फलंदाजीला येत सर्वाधिक धावा खेळण्याचा विक्रम सुनिल गावसकरांच्या नावावर आहे. जगातील कोणत्याही कसोटी संघात याच कामगिरीमुळे हा खेळाडू सलामीला स्थान पटकावेल असाच. १२५ पैकी कसोटी सामन्यांपैकी गावसकर याच क्रमांकावर ११० सामने खेळले. यात त्यांनी ४८.०८च्या सरासरीने ८५११ धावा केल्या. गावसकर सोडून जगात कोणत्याही फलंदाजाला या क्रमांकावर ८ हजारांपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत.
गावसकर हे मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. तसेच तेथेही अतिशय उच्च दर्जाची कामगिरी केली. याचमुळे सलामीला फलंदाजीला येत २९ शतकं करणारा हाच खेळाडू या ड्रीम ११मध्येही पहिला चेंडू खेळणार.
२. वसिम जाफर
सुनिल गावसकरांप्रमाणेच वसिम जाफर, विनू मंकड, रवी शास्त्री, फारुक इंजीनिअर किंवा विजय मर्चंट हे पहिल्या क्रमांकवर जास्त सामने खेळले. तर अशुंमन गायकवाड, वसिम जाफर, रोहित शर्मा किंवा फारुक इंजीनिअर हे दुसऱ्या क्रमांकावर चांगले खेळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जेमतेम ५ कसोटी सामने खेळणाऱ्या रोहितने तर ९२.६६च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत.
परंतु एकंदरीत दोन्ही क्रमांकावरील फलंदाजीचा विचार करता वसिम जाफर एवढा योग्य पर्याय या क्रमांकासाठी दुसरा कुणी नाही. जाफरने कसोटीत ३१ सामन्यात ३४च्या सरासरीने १९४४ धावा केल्या आहेत.
३. दिलीप वेंगसरकर
ज्याप्रमाणे वनडेत वेंगसरकर यांनी चौथ्या क्रमांकावर जागा पक्की केली तशीच कसोटीत ते तिसऱ्या क्रमांकासाठीच सर्वोत्तम शिलेदार आहेत. राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा किंवा मोहिंदर अमरनाथ यांच्याप्रमाणे ते देखील एकेकाळी भारताची भिंत म्हणूनच या क्रमांकावर खेळले आहेत.
कारकिर्दीतील ११६ कसोटी सामन्यांपैकी ४९ कसोटी सामने त्या क्रमांकावर खेळले. त्यात त्यांनी ४०च्या सरासरीने २७६३ धावा केल्या. वेंगरसकरांप्रमाणेच या क्रमांकावर अजित वाडेकर, पाॅली उम्रीगर, संजय मांजरेकर किंवा विनोद कांबळी यांनीही चांगली कामगिरी केली आहे. कांबळीने तर या क्रमांकावर १३ सामन्यात ६७च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
मुंबईकर खेळाडूंमध्ये बरेचशे खेळाडू याच क्रमांकावर खेळले. परंतु वेंगसरकरांची कामगिरी ही धावा करण्यात किंवा सर्वाधिक सामने खेळण्यात सर्वात पुढे राहिली.
४. सचिन तेंडूलकर
कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत सचिन सोडून कुणीही एखाद्या विशिष्ट क्रमांकावर १३ हजार पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. चौथ्या क्रमांकावर तब्बल १७९ कसोटी सामने खेळलेल्या सचिनने ५४.४०च्या सरासरीने १३४९२ धावा केल्या. जगातील कोणत्याही क्रिकेटपटूला या क्रमांकवर १० हजार धावांचा टप्पा पार करता आलेला नसताना सचिनने येथे १३ हजार धावा करणे म्हणजे आश्चर्यच आहे. त्यामुळे सचिन सोडून दुसरा कोणताही खेळाडू कोणत्याच ड्रीम ११मध्ये येथे असणे योग्य ठरणार नाही.
५. अजिंक्य रहाणे
भारतीय संघाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणे हा मोहम्मद अझरुद्दीन व सौरव गांगुलीनंतर तिसरा आहे. महाराष्ट्रातील कोणताही खेळाडू रहाणेएवढे सामने या क्रमांकावर खेळला नाही.
रहाणेने ५६ कसोटी सामन्यात या क्रमांकावर ३९.९२च्या सरासरीने ३१९४ धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, दिलीप वेंगसरकर किंवा पाॅली उम्रीगर यांनी रहाणेपेक्षा या क्रमांकावर चांगल्या सरासरीने धावा केल्या आहेत. चंदू बोर्ड, रवी शास्त्री किंवा रोहित शर्माही या क्रमांकावर खेळले आहेत. परंतु एकंदरीत कामगिरीचा विचार करता रहाणे या क्रमांकासाठी योग्य आहे.
६. फारुक इंजिनीअर (यष्टीरक्षक)
कसोटीत फारुक इंजिनीअर हे या क्रमांकावर अगदीच ४ सामने खेळले. ४६ कसोटी खेळलेले इंजिनीअर हे बरेच सामने हे वरच्या क्रमांकावर खेळले. परंतु महाराष्ट्रातील एकंदरीत यष्टीरक्षक फलंदाजांचा विचार केला तर कायमच वाणवा दिसते. त्यात इंजिनीअर यांनी यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी केली आहे. तसेच या क्रमांवर खेळताना त्यांनी ४२च्या सरासरीने धावाही केल्या आहेत.
७. रवी शास्त्री
रवी शास्त्री हे असे फलंदाज होते ज्यांनी कसोटीत १० वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. कोणत्याही क्रमांकावरील फलंदाजीचे विक्रम पाहताना शास्त्रींचे नाव कुठे ना कुठे असतेच.
एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिले जात होते. तसेच ७व्या क्रमांकावर एक चांगला अष्टपैलू खेळाडू असेल तर संघाच्या फलंदाजीला खोली येतेच परंतु एक गोलंदाजाची गरजही पुर्ण होते. शास्त्रींनी ८० कसोटी सामन्यात ३५.७९च्या सरासरीने ३८३० धावा व ४०.९६ च्या सरासरीने १५१ विकेट्सही घेतल्या आहेत.
८. सुभाष गुप्ते
कसोटी कारकिर्दीत जेमतेम ३६ सामने खेळायला मिळालेल्या गुप्तेंनी आपल्या फिरकीवर जगभरातील गोलंदाजांना चांगलेच रडवले. २९.५५च्या चांगल्या सरासरीने या गोलंदाजाने कसोटीत १४९ विकेट्स घेतल्या. एकवेळ पुर्णवेळ गोलंदाज म्हणून त्यांची कामगिरी नक्कीच चांगली राहिली. संघात एकवेळ पुर्णवेळ फिरकीपटू कसोटीत विकेट्सबरोबर वेगवान गोलंदाजांना बऱ्याच वेळा विश्रांती देण्यासही मदत करतो. गुप्ते त्यांच्यावेळी एक वर्ल्डक्लास लेग ब्रेक गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. कारकिर्दीची गोलंदाजीची सुरुवात उशीरा करणाऱ्या या गोलंदाजाने २३च्या सरासरीने पहिल्या ५० विकेट्स घेतल्या होत्या.
९. झहिर खान
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज राहिलेल्या झहीर खानने भारताकडून कसोटीत ९२ सामन्यात ३११ विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाजांमध्ये कपिल देवनंतर झहिर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे.
वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात झहीरचा समावेश म्हणजे तो एकप्रकारे अन्य गोलंदाजांचाही मार्गदर्शकही असेल. तसेच डावखुरा गोलंदाज असल्याने फलंदाजांना अडचणीत आणताना तो इतर गोलंदाजांबरोबर चांगली कामगिरी करु शकतो.
१०. उमेश यादव
भारतीय वेगवान गोलंदाजांमधील एक मोठे नाव म्हणजे उमेश यादव. विदर्भातील तो असा पहिला खेळाडू होता जो भारताकडून क्रिकेट खेळला. उमेशचा वेग व गोलंदाजीचा टप्पा हे कसोटी क्रिकेटधील त्याची मुख्य अस्त्र.
भारताकडून ४६ कसोटी खेळलेल्या या गोलंदाजाने ३०.४७च्या सरासरीने १४४ विकेट्स घेतल्या आहे. झहिरसारख्या सिनीयर डाव्या हाताच्या गोलंदाजाबरोबर उमेश उजव्या हाताने गोलंदाजी करत फलंदाजांना अडचणीत आणू शकतो.
११. रमाकांत देसाई
माजी मध्यमगती गोलंदाज राहिलेल्या रमाकांत देसाई यांनी २८ कसोटी सामन्यात भारताकडून ३७.३१च्या सरासरीने ७४ विकेट्स घेतल्या. त्यांनी झहिर किंवा उमेश सोडून महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
संघात सुभाष गुप्ते किंवा रवी शास्त्रींसारखे दोन फिरकीपटू असताना व सचिनसारखा कामचलाऊ फिरकीपटू असल्याने वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून देसाईंचा समावेश योग्य वाटतो.
वाचा- फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११