सोमवारी (२० जुलै) आयसीसीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या टी२० विश्वचषक स्पर्धेची तिकीटे विकली गेली आहेत. परंतु आता स्पर्धा तर पुढे ढकलण्यात आली आहे, मग तिकीटांचं काय? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोंगावत असेल.
असे असले तरी २०२१मध्ये भारताऐवजी ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकाचे यजमानपद स्विकारले, तर स्थगित करण्यात आलेल्या २०२० टी२० विश्वचषकाची तिकीटे तोपर्यंत वैध राहणार आहेत.
असे जरी असले, तरी कोणता देश कोणत्या वर्षी टी२० विश्वचषकाचे यजमानपद स्विकारणार हे आयसीसीने अद्याप सांगितलेले नाही. कारण आयोजनाशी निगडीत काही गोष्टी आहेत, ज्यांचे निरासन ऑस्ट्रेलिया आणि भारताला करायचे आहे.
आयसीसीने आपल्या तिकीट भागीदारांमार्फत तिकिटांची विक्री सुरू केली होती आणि मोठ्या प्रमाणात तिकिटेही विकली गेली होती. आयसीसीने म्हटले, “तिकीट धारकांची तिकीटे टिकवून ठेवण्याबद्दल त्यांचे स्वागत आहे. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया स्पर्धेचे आयोजन करत असेल, तर तिकीटे खरेदी केलेल्या प्रेक्षकांसाठी ती तिकीटे कायम राहतील व आपोआप नवीन तारीख मिळेल.”
“जर ऑस्ट्रेलियाने २०२२ मध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन केले, तर तिकीटे खरेदी करणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटांचे पैसे पुन्हा दिले जातील,” असेही त्यांनी पुढे म्हटले.
स्पर्धेच्या तारखांची पुष्टी होईपर्यंत प्रेक्षक तिकीटे ठेवू शकतात. १५ डिसेंबरपर्यंत तिकीटे परत करण्याची विनंती करता येईल आणि ऑनलाईन अर्जाच्या ३० दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया केली जाईल. हॉस्पिटॅलिटी पॅकेजेस देखील २०२१ मध्ये वैध असतील.