मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग हा भारताच्या सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये समावेश आहे. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फिनिशरमध्ये त्याचा समावेश आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये युवराजची बॅट जोरदार चालत होती. त्याच्या नावावर अनेक महत्त्वपूर्ण विक्रम आहेत. पण त्याला कसोटी खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही आणि युवराजला याबद्दल वाईट वाटते.
टाईम्स नाऊशी बोलताना युवराज सिंग म्हणाला की, आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवातून बरेच काही शिकले आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते कर्करोगाविरूद्धच्या लढाईपर्यंत त्याने बरेच काही मिळवले आणि अनुभवाने त्याला अधिक चांगले केले.
2011 च्या विश्वचषकात मालिकेवीर ठरलेला युवराज म्हणाला, ”जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला असे वाटते की मला कसोटी सामने खेळण्याची अधिक संधी मिळायला हवी होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुलीसारख्या खेळाडूंच्या उपस्थितीत संधी मिळणे कठीण होते.”
युवराजच्या मते, जिथे आजच्या खेळाडूंना दहापेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्याची संधी मिळते, तिथे त्यांना फक्त एक किंवा दोन संधी मिळाल्या. तो म्हणाला, “मधल्या फळीत स्थान मिळवणे कठीण होते. आम्हाला कमी संधी मिळायच्या. मला वाटते की सौरव गांगुली निवृत्त झाला तेव्हा मला एक संधी मिळाली पण त्यानंतर मला कर्करोग झाला आणि आयुष्याने एक नवीन वळण घेतले.” तथापि, युवराजला आपल्या कारकीर्दीचा अभिमान आहे आणि त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केल्याचा आनंद आहे.
युवराज सिंगने आपल्या कारकीर्दीच्या दुसर्या सामन्यातून झलक दाखवायला सुरुवात केली. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर 2002 मध्ये होणार्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच 2007 मध्ये झालेल्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात 6 षटकार ठोकले. 2011 मध्ये तर भारताच्या विश्वचषक विजयाचा युवराज हा नायक ठरला. या स्पर्धेत तो मालिकावीर ठरला.
युवराज सिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 40 कसोटी सामन्यांमध्ये 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने 3 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली होती.