टी20 क्रिकेटला ज्या देशाने सर्वात मोठा विरोध केला तोच देश अर्थात भारत पुढे जाऊन या क्रिकेटच्या प्रकारातील सर्वात मोठा साम्राज्य बनला. या देशाने आयपीएल सारख्या सर्वात यशस्वी लीग क्रिकेटला 2008 मध्ये जन्म दिला. परंतु हा संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना कधी खेळला माहित आहे? 16 वर्षांपूर्वी अर्थात 1 डिसेंबर 2006 रोजी भारतीय संघ आपला पहिला टी20 सामना खेळला.
विशेष म्हणजे भारतीय संघ आपला पहिलाच सामना जिंकला देखील. हा सामना झाला होता जोहान्सबर्ग येथे आणि विरोधी बाजूला संघ होता बलाढ्य दक्षिण आफ्रिका.
दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार ग्रॅमी स्मिथने त्यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. आफ्रिका संघाने फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 126 धावा केल्या होत्या. त्यात एल्बि मॉर्केलने सर्वोच्च अर्थात 27 धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष 19.5 षटकांत पार करताना 4 फलंदाज गमावले होते. त्यात कर्णधार सेहवाग 34, दिनेश मोंगिया 38 आणि दिनेश कार्तिक 31 यांनी सर्वोच्च धावा केल्या होत्या.
या सामन्यात भारताकडून 11 खेळाडूंनी तर दक्षिण आफ्रिकेकडून टॅरन हॅंडरसनने आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते.
या सामन्यातील काही मनोरंजक आकडेवारी-
-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एकमेव जो टी20 सामना खेळला तो हाच. यात सचिनने 10 धावा केल्या होत्या.
-भारतीय संघात तेव्हा खेळलेल्या 11 पैकी 8 खेळाडूंनी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून पूर्णपणे संन्यास घेतला आहे. ज्यामध्ये सचिन, सेहवाग, आगरकर, झहीर खान, एमएस धोनी, सुरेश रैना यांचा समावेश आहे.
-11 पैकी एकही खेळाडू सध्याच्या टीम इंडियाचा भाग नाही.
-11 पैकी दिनेश मोंगिया आणि एस. श्रीशांत यांच्यावर भ्रष्टाचाराचे किंवा मॅच फिक्सिन्गचे आरोप आहेत. परंतु आताच श्रीशांतला या आरोपातून मुक्त केले आहे.
-भारतीय संघ जेव्हा आजच्या दिवशी आपला पहिला टी20 सामना खेळला होता तेव्हा ऑस्ट्रेलिया (4), इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी 3 तर श्रीलंका, विंडीज, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि बांगलादेश हे प्रत्येकी एक सामना खेळले होते.
-या सामन्यात खेळलेल्या 11 पैकी 3 खेळाडूंनी भारताचे टी20 मध्ये नेतृत्व केले.
-आजपर्यंत भारतीय संघाचे टी२०मध्ये नेतृत्व केलेले केवळ ६ खेळाडू झाले आहेत. ज्यात सेहवाग (1), धोनी (72), सुरेश रैना(3), अजिंक्य रहाणे(2), विराट कोहली (50), रोहित शर्मा (51) आणि हार्दिक पंड्या (5) यांचा समावेश आहे.
-सचिनने या सामन्यात १ विकेट घेतली होती.
वाचा- क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?