वेस्टइंडीजनंतर ऑस्ट्रेलिया ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपला दबदबा राखला होता. परंतु, मागील जवळपास दीड दशकापासून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताने स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अश्या सगळ्या प्रारूपात भारतीय संघ अव्वल तीनमध्ये तरी नक्कीच असतो.
पण, या शानदार कामगिरीला एक काळी किनार सुद्धा आहे. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून भारताने एकही आयसीसी स्पर्धा जिंकली नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेली ती अखेरची महत्त्वाची ठरली स्पर्धा होती. भारतीय संघ अनेक स्पर्धात चांगली कामगिरी करत उपांत्य किंवा अंतिम फेरी खेळला आहे परंतु यश पदरात पडले नाही.
अशावेळी क्रिकेटप्रेमींच्या तोंडून अनेकदा बाहेर येते की, ” जर, हा दुसऱ्या देशाचा खेळाडू आपल्या संघात असता तर आपण जिंकलो असतो रे”
आज आपण अशाच तीन खेळाडूंविषयी जाणून घेऊया जे भारतीय संघात असते तर कदाचित भारताने या सात वर्षाच्या काळात दोन-तीन आयसीसी स्पर्धांवर कब्जा केला असता.
१) जोस बटलर (Jos Buttler)
या सूचीमध्ये पहिले नाव आहे इंग्लंडचा विकेटकिपर जोस बटलर याचे. महेंद्रसिंग धोनीसारखी खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन जबाबदारी सोबतच वेगाने धावा काढण्याची क्षमता बटलरमध्ये आहे.
सध्या भारतीय संघात ही भूमिका के एल राहुल (KL Rahul) पार पाडत आहे.
या भूमिकेसाठी विदेशी खेळाडूंवर नजर टाकली तर बटलरपेक्षा उत्तम पर्याय दुसरा सापडतच नाही. इंग्लंडसाठी तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो फिनिशरची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहे. तसेच बटलर शतकी खेळी करताना १०० पेक्षा कमी चेंडूच खेळतो. त्यामुळे स्ट्राईक रेट ही एक मोठी गोष्ट संघासाठी उपयोगी ठरते.
आयपीएल (IPL) मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी अनेक सामने बटलरने एकहाती जिंकून दिले आहेत. बटलरसारखा उत्तम यष्टिरक्षक आणि आक्रमक फलंदाज भारतीय संघासाठी नक्कीच लाभदायी ठरेल.
२) राशिद खान (Rashid Khan)
भारतामध्ये तुफान ‘फॅन फॉलोइंग’ असणारा अफगाणिस्तानचा कर्णधार व लेगस्पिनर राशिद खान हा देखील भारताला हवाहवासा वाटणारा खेळाडू आहे. भारतीय संघात चांगल्या फिरकी गोलंदाजांची कमी नाही. परंतु, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फटकेबाजी करण्याची कला आणि एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून राशिद खानची ख्याती आहे.
राशिद खान आत्तापर्यंत अफगानिस्तानकडून ४ कसोटी, ७१ एकदिवसीय आणि ४८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सहभागी झाला आहे त्यामध्ये त्याने क्रमशः २३,१३३ व ८९ बळी मिळवले आहेत. यासोबतच तो जगभरात टी२० लीग खेळत असतो.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) तसेच आर. अश्विन (R.Ashwin) यांच्या सोबतीला राशिद खान असेल तर भारताच्या कामगिरीला चार चाँद नक्की लागतील.
३) बेन स्टोक्स (Ben Stokes)
इंग्लंडच्या विश्वचषक विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्स हा देखील भारतीय संघासाठी अत्यंत उपयोगी खेळाडू ठरु शकतो. बेन स्टोक्स सध्या आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. विश्वचषका पाठोपाठ २०१९ च्या अॅशेस मालिकेचा देखील तो मालिकावीर ठरला होता.
आक्रमक फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून बेन स्टोक्स नावाजला जातो. सध्या भारतीय संघात हार्दिक पांड्या त्याच प्रकारचा खेळाडू आहे आणि भविष्यात भारतीय संघासाठी मोठे नाव होऊ शकतो. परंतु, सध्या बेन स्टोक्स जगातील सर्वच अष्टपैलू खेळाडूंच्या तुलनेत खूप पुढे गेला आहे.