भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (१६ सप्टेंबर) मोठा निर्णय घेतला. त्याने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपल्यानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारताच्या टी२० संघाला नवा नियमित कर्णधार मिळणार हे निश्चित झाले आहे.
विराटने तिन्ही क्रिकेट प्रकारात गेले ५-६ वर्षे नियमितपणे नेतृत्वपद सांभाळल्याने कामाचा ताण वाढत असल्याचे कारण देत, टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर आता भारताचा पुढचा टी२० कर्णधार कोण असेल, याची चर्चा सुरु आहे. यामध्ये रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. असे असले तरी त्याला युवा खेळाडूंकडून याबाबतीत आव्हान मिळू शकते.
या लेखात आपण अशा क्रिकेटपटूंचा आढावा घेऊ जे भारताचे टी२० कर्णधार बनू शकतात
१. रोहित शर्मा
भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद मिळण्याच्या शर्यतीत रोहितचे नाव आघाडीवर आहे. कारण, त्याच्याकडे नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. तो गेली अनेकवर्षे भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचे उपकर्णधारपद सांभाळत आहे. तसेच त्याने विराटच्या अनुपस्थितीत २९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे नेतृत्वही केले आहे.
रोहितने आत्तापर्यंत १० वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यातील ८ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर २ सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचबरोबर रोहितने १९ टी२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यातील केवळ ४ सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. तर १५ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेेच रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या ४ मोसामांचे आयपीएल विजेतेपद मिळवले आहे.
मात्र, रोहितच्या विरोधात एक गोष्ट जाते, ती म्हणजे त्याचे वय. रोहितचे वय सध्या ३४ वर्षे आहे. त्यामुळे जर बीसीसीआयने पुढील अनेक वर्षांचा विचार केला, तर रोहितला कर्णधारपद मिळणे कठीण आहे.
२. श्रेयस अय्यर
गेल्या २-३ वर्षांपासून श्रेयस अय्यर हे नाव भारतीय क्रिकेटमध्ये चांगलंच चर्चेत आहे. श्रेयस भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघातील नियमित सदस्य आहे. पण, त्याला या वर्षाच्या सुरुवातीला खांद्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. परिणामी, त्याला जवळपास ६ महिने क्रिकेट मैदानापासून दूर राहावे लागले. याचमुळे त्याला टी२० विश्वचषकासाठी १५ जाणांच्या भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. पण, त्याचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे.
पण, असे असले तरी श्रेयसकडे कर्णधारपदाचा पुरेसा अनुभव आहे. श्रेयसने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या काही सामन्यांमध्ये नेतृत्वही केले आहे. एवढेच नाही तर श्रेयसने दिल्ली कॅपिटल्स संघाचे २०१८ च्या मोसमातील काही सामन्यात, तर २०१९ आणि २०२० सालच्या आयपीएल हंगामात नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने उत्तम कामगिरी देखील केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या आयपीएल मोसमात दिल्लीने प्लेऑफमध्ये प्रवेशही मिळवला होता. तसेच २०२० च्या आयपीएल हंगामात दिल्लीने अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला. मात्र, अंतिम सामन्यात दिल्लीला मुंबई इंडियन्सकडून पराभव स्विकारावा लागला. पण, या दोन्ही हंगामात श्रेयसकडे असलेले नेतृत्वगुण सर्वांना पाहायला मिळाले.
असे असले तरी, त्याच्या खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला यंदा आयपीएल २०२१ च्या हंगामात दिल्लीचे कर्णधारपद गमवावे लागले आहे. तसेच टी२० विश्वचषकासाठीही तो भारतीय संघात स्थान न मिळवू शकल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. पण, जर त्याच्या नेतृत्वगुणांचा विचार केल्यास तो कर्णधार होऊ शकतो.
३. रिषभ पंत
भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंत खेळतो. गेल्या २-३ वर्षापासून तो भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू झाला आहे. त्याने अनेकदा त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिले आहेत. तसेच यंदा श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२१ हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व तोच करत आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात उत्तम कामगिरी केली होती. संघाने ८ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला होता. त्याच्या याच कामगिरीचा फायदा त्याला झाला असून आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अय्यरने पुनरागमन होऊनही रिषभच दिल्लीच्या कर्णधारपदी कायम राहिला आहे.
रिषभच्या बाजूने आणखी एक गोष्ट झुकते माप देते, ते म्हणजे त्याचे वय. तो आत्ता केवळ २३ वर्षांचा असून भारताच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील नियमीत सदस्य आहे. त्यामुळे, जर पुढील अनेक वर्षांचा विचार करायचा झाल्यास पंत एक चांगला पर्याय ठरु शकतो. याशिवाय तो यष्टीरक्षक आहे. असे म्हटले जाते की एक यष्टीरक्षक संघाचा चांगला कर्णधार होऊ शकतो, कारण तो अशा ठिकाणी उभा असतो, जिथून त्याला मैदानाच चौफेर नजर ठेवता येते.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा का व्हायला हवा भारताच्या टी२० संघाचा कर्णधार, ‘ही’ आहेत ३ महत्त्वाची कारणं
राजस्थान रॉयल्स मागची साडेसाती संपेना! आता ‘हा’ आक्रमक फलंदाजही जखमी
‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण