भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व अनेक दिग्गज खेळाडूंनी केले. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली यांनीही भारतीय संघाची कमान सांभाळली आहे. याचसोबत कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांनी ही नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. भारताने २००७ साली आयसीसी टी २० विश्वचषक आणि २०११ साली आयसीसी विश्व करंडक या दोन्ही स्पर्धा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.
यासह भारतीय क्रिकेट संघाने अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू दिले आहेत. क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमधून आपली चमक खेळाडूंनी दाखवूनही त्यांना भारतीय संघाचे कर्णधार पद मिळू शकले नाही. आज अशा तीन खेळाडूंची माहिती सांगणार आहोत जे भारतीय संघाचे कर्णधार होऊ शकले असते पण त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.
युवराज सिंग –
युवराज सिंग क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला म्हणावे तसे यश लाभले नाही. युवराज सिंगने त्याच्या कारकिर्दीत भारताकडून चारशेपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळून १० हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तरीही त्याला कर्णधार म्हणून संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिका येथे २००७ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती, पण कर्णधार म्हणून संधी मिळाली नाही.
याच वर्ल्डकपमध्ये त्यांची इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धची ऐतिहासिक खेळीने भारत अंतिम सामन्यात पोहोचलं होतं. तसेच २०११ झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतही अष्टपैलू कामगिरी करत भारताला विश्व करंडक जिंकून दिला होता. सध्या युवराज सिंगने क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमधून निवृत्त झाला आहे.
शिखर धवन –
भारताचा सलामीचा स्टायलिश फलंदाज शिखर धवन संघाकडून १४२ एकदिवसीय, ३४ कसोटी आणि ६४ टी-२० सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून नऊ हजारांपेक्षा जास्त धावा आणि २४ आंतरराष्ट्रीय शतक ठोकले आहे. शिखर सध्या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात भारतीय संघाकडून खेळतोय. मात्र फॉर्मात नसल्याने त्याला कसोटी संघातून डच्चू देण्यात आला आहे.
शिखर धवनला त्याच्या कारकिर्दीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कधीच संधी मिळाली नाही. २०१८ साली झालेल्या आशिया कप स्पर्धेत विराट कोहली खेळत नव्हता. तेव्हा त्याच्या जागी रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळत होता. तर शिखरवर उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे अफगाणिस्तानविरुद्धच्या झालेल्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने कर्णधार आणि उप कर्णधाराला विश्रांती दिली होती. महेंद्रसिंग धोनी हा या सामन्यात नेतृत्व करत होता. कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचा २०० वा सामना होता. या सामन्यात शिखर धवनला नेतृत्व करण्यासाठी संधी होती पण महेंद्रसिंग धोनीमुळे ती मिळू शकली नाही.
चेतेश्वर पुजारा-
चेतेश्वर पुजारा भारतीय कसोटी संघातील महत्त्वाचा आणि नियमित खेळाडू आहे. त्याने आता पर्यंत ८५ कसोटी सामने आणि ५ एकदिवसीय सामने खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ६ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यासोबत १८ कसोटी शतकाची नोंद त्याच्या नावावर आहे. २०१८ भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गेला होता पहिल्या दोन कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्यात आले होते.
त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ एकमेव कसोटी खेळण्यास भारतात आला होता. या सामन्याची नेतृत्वाची जबाबदारीही अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात वगळण्यात आलेल्या खेळाडूंवर नेतृत्वाची जबाबदारी संघ व्यवस्थापनाने दिली होती. पण चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघातील नियमित सदस्य असताना देखील त्याला नेतृत्वाची संधी दिली गेली नाही. भारतीय संघातील स्पर्धा पाहता भविष्यकाळातही पुजाराला नेतृत्व करण्याची संधी मिळेल ही शक्यता फारच कमी आहे.