भारतीय संघाचे दोन दिग्गज खेळाडू एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनी शनिवारी (१५ ऑगस्ट) सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. धोनीच्या बाबतीत असे तर्क लावले जात होते की, तो कदाचित टी२० विश्वचषकात खेळेल, तर काही लोकांचे असे मत होते की तो आता खेळणार नाही. परंतु रैनाच्या बाबतीत कोणाच्या मनातही असा विचारही आला नसेल, की तो धोनीनंतर लगेचच आपलीही निवृत्ती जाहीर करेल.
धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर तासाभरात रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम- राम ठोकला. धोनी आणि रैना यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील कट्टर मैत्री थेट निवृत्तीच्या निर्णयापर्यंत नेहमी सोबत राहिली. धोनी आणि रैनाने अनेक प्रसंगी आपल्या फलंदाजीने भारतीय संघाला विजयाचा मानकरी बनविले आहे.
धोनी आणि रैनाने भारतीय क्रिकेटला एक वेगळे स्थान मिळवून दिले आहे. २०११ च्या विश्वचषक विजयात हे दोन्हीही खेळाडू सोबतच होते. याव्यतिरिक्त आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठीही हे दोन्ही खेळाडू २००८ पासून एकत्र खेळत आहेत तसेच आता त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेत एकमेकांची मैत्री अवघ्या जगताला दाखवून दिली आहे.
या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या बऱ्याच भागीदारींनी संघाला विजय मिळवून दिला आहे. या लेखात आपण धोनी आणि रैनामधील वनडेतील ५ सर्वोच्च भागीदारी पाहणार आहोत.
धोनी आणि रैनामधील वनडेतील ५ सर्वोच्च भागीदारी- 5 Biggest Partnership of MS Dhoni and Suresh Raina in ODI
५. १३६ धावा भागीदारी- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नागपूर (२००९)
२८ ऑक्टोबर २००९ मध्ये नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचे शिलेदार धोनी आणि रैनाच्या जोडीने १३६ धावांची भागीदारी रचली होती. यादरम्यान धोनीने १०७ चेंडूंचा सामना करताना १२४ धावा ठोकल्या होत्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ९ चौकार ठोकले होते. तर रैनाने ५० चेंडूंचा सामना करताना ६२ धावांची खेळी केली होती. यामध्ये १ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश आहे.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३५४ धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ २५५ धावांवर संपुष्टात आला होता.
४. १४४ धावा- विरुद्ध इंग्लंड, कार्डिफ (२०१४)
इंग्लंडविरुद्ध कार्डिफ येथे २७ ऑगस्ट २०१४ रोजी झालेल्या वनडे सामन्यात रैनाने शानदार शतक झळकावत भारतीय संघाने विजय मिळविला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०४ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये रैनाने केवळ ७५ चेंडूंचा सामना करताना १०० धावांची तुफान खेळी केली होती, तर धोनीने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
भारतीय संघाने १३२ धावांवर ४ विकेट्स गमावल्यानंतर रैना आणि धोनीने पाचव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी रचत भारताची धावसंख्या ३०० च्या पार पोहोचविली होती. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघ केवळ १६१ धावांवर संपुष्टात आला होता.
३. १६६ धावा- विरुद्ध हाँगकाँग, कराची (२००८)
२५ जून २००८ रोजी कराची येथे आशिया चषकातील चौथा सामना भारत आणि हाँगकाँग संघात पार पडला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्स गमावत ३७४ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये धोनी आणि रैनाची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली होती.
धोनी आणि रैनाने चौथ्या विकेटसाठी १६६ धावांची दीडशतकी भागीदारी रचली होती. या सामन्यात धोनीने ९६ चेंडूत नाबाद १०९ धावा केल्या होत्या, तर रैनानेही ६८ चेंडूत १०१ धावा करत शतकी खेळी रचली होती. भारताने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँग संघ केवळ ११८ धावांवर सर्वबाद झाला होता. अशाप्रकारे भारतीय संघ २५६ धावांच्या विशाल अंतराने विजयी झाला होता.
२. १६९ धावा- विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स (२०११)
११ सप्टेंबर २०११ रोजी लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड संघात चौथा वनडे सामना पार पडला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत २८० धावा केल्या होत्या. तरीही एकवेळ अशी होती की भारतीय संघ ४ विकेट्स गमावत ११० धावांवर होता. परंतु रैना आणि धोनीच्या १६९ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचविण्यात मदत केली होती.
या सामन्यात रैनाने ७५ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या, तर धोनीने ७१ चेंडूत ७८ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलागल करताना इंग्लंड संघाने ८ विकेट्स गमावत २७० धावा केल्या होत्या. त्यावेळी पावसामुळे हा सामना डकवर्थ लूईस नियमानुसार बरोबरीत सुटल्याचा निर्णय झाला.
१. १९६ धावा- विरुद्ध झिंबाब्वे, ऑकलँड (२०१५)
१४ मार्च २०१५ रोजी ऑकलँड येथे झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या खूप जवळ होता. परंतु धोनी आणि रैनाच्या भागीदारीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वे संघाने ब्रेंडन टेलरच्या (१३८) शतकी खेळीच्या मदतीने २८७ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या ४ विकेट्स १०० धावांच्या आतच पडल्या होत्या. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनच्या विकेट्सचा समावेश होता.
परंतु धोनी आणि रैनाने १९६ ची धडाकेबाज भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. यामध्ये रैनाने नाबाद ११० आणि धोनीने नाबाद ८५ धावा ठोकल्या होत्या. धोनीने ४९ व्या षटकात षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता.
ट्रेंडिंग लेख-
-तुम्हाला माहित आहे का? धोनीच्या वनडे, टी२० व कसोटीतील शेवटच्या सामन्यातील कामगिरी?
-या ३ विदेशी खेळाडूंची उणीव जाणवणार यावर्षी आयपीएलमध्ये
-‘फिनिशर’ धोनीने वनडेत केला आहे असा कारनामा, जो कोणाच करता आला नाही
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताला विश्वचषक जिंकून देणारा प्रशिक्षक म्हणतोय, ‘धोनी सोबत असेल, तर…’
-अतिशय खास व्यक्तीकडून धोनीसाठी खास मेसेज, तू जे केलंय….
-धोनी फेअरवेल सामन्यासाठी हापापला नव्हता, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचा बीसीसीआयवर हल्लाबोल