कसोटी क्रिकेटमध्ये सामनावीर मिळविणे हा एक सन्मान आहे. सचिन तेंडुलकर आणि मुथय्या मुरलीधरन हे असे दोन खेळाडू होते ज्यांनी अनेक कसोटींमध्ये संघासाठी अविस्मरणीय कामगिरी केली आणि सामनावीर ठरले. जॅक कॅलिस देखील अष्टपैलू कामगिरीमुळे अनेकदा सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू होता. कॅलिसने २३ सामानावीराचे पुरस्कार आपल्या नावे केले आहेत, जो एक विश्वविक्रमही आहे.
तसे, कसोटीत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्याच्या यादीमध्ये सचिनचे नाव खूपच खाली आहे आणि तो ७ व्या क्रमांकावर आहे. मुरलीधरनने १९, वसीम अक्रम आणि शेन वॉर्न १७, कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी १६ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. सचिनने १४ पुरस्कार जिंकले असून वेस्ट इंडीजचे जलदगती गोलंदाज कर्टली एम्ब्रोज आणि स्टीव्ह वॉ त्याच्या बरोबरीत आहेत. सचिनच्या पाठोपाठ राहुल द्रविड (११) आणि अनिल कुंबळे (१०) यांचा समावेश आहे.
पण दुसरीकडे न्यूझीलंडचा नॅथन अॅस्टल हा एक अव्वल फलंदाज होता आणि त्याने वेगवान दुहेरी शतक ठोकण्याचा विक्रमही रचला होता. तो कित्येक वर्ष क्रिकेट खेळाला. त्याने ८१ कसोटी सामने खेळले असून त्याला मात्र एकदाच सामनावीर पुरस्कार मिळाला.
चला या लेखात अव्वल ५ क्रिकेटपटूंवर नजर टाकू ज्यांना कसोटी क्रिकेट कारकीर्दीत एकाही ‘सामनावीर पुरस्कार’ मिळालेला नाही.
५. मोईन खान – पाकिस्तान (६९ सामने)
९० च्या दशकात मोईन खान हा पाकिस्तान संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य होता आणि जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये त्यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त तो १९९२ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. मोईन खान आणि रशीद लतीफ यांनी त्यांच्या काळात संघातील स्थानासाठी जोरदार झुंज दिली होती, परंतु मोईन खानला फलंदाजीमुळे पसंती देण्यात आली होती. खालच्या फळीत त्याने पाकिस्तानसाठी अतिशय उपयुक्त खेळी खेळल्या आहेत.
मोईनने पाकिस्तानकडून ६९ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ४ शतके आणि २८.५५ च्या सरासरीने २७४१ धावा केल्या. फलंदाजीत खूप चांगली कामगिरी असताना तसेच यष्ट्यांच्या मागे महत्त्वपूर्ण योगदान देऊनही मोईन खानला सामनावीर म्हणून कधीच पुरस्कार मिळाला नाही.
४. सय्यद किरमानी – भारत (८८ सामने)
एमएस धोनीनंतर सय्यद किरमानी हे भारताचे दुसरे अनुभवी यष्टीरक्षक आहेत. ते १९८३ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. या व्यतिरिक्त भारतीय संघाने भारताबाहेर अनेक कसोटी मालिका जिंकल्या त्या मालिकांमध्ये किरमानी यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यावेळी फक्त यष्टिरक्षकांना यष्टिरक्षण करण्यासाठी संघात ठेवले जायचे.
असं असूनही त्यांनी फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. खालच्या फळीवर फलंदाजी करत त्याने १९८३ विश्वचषकात शानदार खेळी साकारली. कपिल देव यांच्यासोबत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ९ व्या विकेटसाठी १२६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली होती. त्यांचा हा विक्रम २०१० पर्यंत टिकून राहिला होता. किरमानीने कसोटी सामन्यात २ शतकांच्या मदतीने २७.०४ च्या सरासरीने २७५९ धावा फटकावल्या, पण त्यांना कधी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले नाही.
३. बॉब विलिस – इंग्लंड (९० सामने)
बॉब विलिस इंग्लंडचे महान वेगवान गोलंदाज होते. इंग्लंडकडून विलिस यांनी ९० कसोटी सामने खेळले असून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या इंग्लिश गोलंदाजांमध्ये ते चौथ्या क्रमांकावर आहेत. १९८१ मध्ये अॅशेसमध्ये त्यांनी एका डावात ४३ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या.
कसोटी क्रिकेटमधील एक डावातील ही उत्तम गोलंदाजीपैकी एक असल्याचे अजूनही मानली जाते. १९८७ मध्ये त्यांना “विस्डन क्रिकेटर ऑफ दि इयर” म्हणून निवडले गेले होते.
९० कसोटी सामन्यात विलिस यांनी २५.२० च्या सरासरीने ३२५ विकेट्स घेतल्या, त्यामध्ये १६ वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत. इतकी उत्कृष्ट कामगिरी करूनही त्यांना कधीही सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे.
२. इयान चॅपल – ऑस्ट्रेलिया (७५ सामने)
इयान चॅपल एक उत्तम फलंदाज होते. त्याचबरोबर ग्रेग आणि ट्रेव्हर चॅपल हे त्यांचे दोन भाऊदेखील ऑस्ट्रेलियाकडून खेळले आहेत. इयान चॅपेल यांनी बिल लॉरीनंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने १९७४-७५ च्या अॅशेस मालिकेमध्ये इंग्लंडचा ४-१ असा पराभव केला. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने १९७५ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला, परंतु त्या सामन्यात त्यांचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला.
इयान चॅपेलने ऑस्ट्रेलियाकडून ७५ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ४२.४२ च्या सरासरीने ५३४५ धावा केल्या. त्यांनी १४ शतकेही केली ज्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या १९६ होती. परंतु ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा सदस्य असूनही आणि चांगला खेळ करूनही इयान चॅपल यांना कधीही सामनावीर पुरस्कार मिळाला नाही.
१. जोएल गार्नर – वेस्ट इंडीज (५८ सामने)
७०-८० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांना त्रस्त केले होते. मायकेल होल्डिंग, मॅल्कम मार्शल आणि अँडी रॉबर्ट्स यांच्यासोबत ६ फूट ८ इंच उंच जोएल गार्नर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा सदस्य होते. खरं तर ज्या फलंदाजांनी त्यांच्या विरुद्ध फलंदाजी केली असेल, ते त्यांच्या घटक गोलंदाजीबद्दल सांगू शकतात.
क्लाईव्ह लॉयडच्या नेतृत्वात त्या काळातील कॅरेबियन संघाला रोखणे अशक्य होते. जोएल गार्नरने ५८ कसोटी सामन्यांमध्ये २०.९७ च्या सरासरीने २५९ बळी घेतले आणि अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. त्यांनी एका डावात ७ वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी ५६ धावांत ६ विकेट्स होती. एवढे मोठे विक्रम असूनही गार्नरला सामनावीर पुरस्कार कधीच मिळाला नाही. पण त्याला दोनदा मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले आहे.
ट्रेंडिंग लेख –
भारतीय फुटबॉलचा आधारस्तंभ – सुनील छेत्री
जेव्हा क्रिकेटपटूंनी भरलेले जहाज भयानक तूफानामुळे बुडाले, झाला होता अनेक क्रिकेटर्सचा मृत्यू
आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात हे ५ दिग्गज विदेशी खेळाडू दिसणार नाहीत, संघांचे टेन्शन वाढले
महत्त्वाच्या बातम्या –
रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…
माजी गोलंदाज म्हणतोय, डीआरएस आधी असतं तर कधीच १० विकेट्स घेतल्या असत्या