श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोलंबो येथे टी२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने १-० अशी आघाडी मिळवली असून, मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (२७ जुलै) खेळविला जाणार होता. मात्र, भारतीय संघाचा अष्टपैलू कृणाल पंड्या हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कृणाल कोरोनाबाधित असल्याचे वृत्त आल्यानंतर इंग्लंडमध्ये असलेल्या वरिष्ठ भारतीय संघामध्ये टेन्शनचे वातावरण तयार झाले आहे.
कृणालमुळे भारतीय खेळाडू झाले क्वारंटाईन
दुसरा टी२० सामना सुरु होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना कृणाल पंड्या कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली. त्याची ऐंटीजन चाचणी सकारात्मक आली. त्यामुळे, कृणालच्या संपर्कात आलेल्या आठ भारतीय खेळाडूंना क्वारंटाईन व्हावे लागले. सर्व खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट केल्यानंतर ही मालिका पुढे खेळवण्यात येणार की नाही याबाबत निर्णय होईल.
विराटसेना आली टेन्शनमध्ये
श्रीलंकेमध्ये असलेला कृणाल कोरोनाबाधित आढळल्याने इंग्लंडमध्ये असलेला भारताचा वरिष्ठ संघात चिंतेत सापडला आहे. कारण, कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा देखील समावेश आहे. या दोघांची निवड इंग्लंड दौऱ्यावर दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूंच्या जागी झाली असून, ते लवकरच इंग्लंडला रवाना होणार होते. इंग्लंडमध्ये असलेले शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर व आवेश खान हे मालिकेपूर्वी दुखापतग्रस्त झाले आहेत.
यापूर्वी देखील हे खेळाडू आले कोरोना पॉझिटिव्ह
सध्या इंग्लंडमध्ये असलेला संघातील यष्टीरक्षक रिषभ पंत हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्यानंतर तो या आजारातून पूर्णपणे बरा होऊन पुन्हा संघाला सामील झाला. संघाचे थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गिरानी हे देखील कोरोनाबाधित असल्याने सध्या क्वारंटाईन आहेत. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा व अभिमन्यू ईस्वरन हे देखील दहा दिवस क्वारंटाईन होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कृणाल पंड्याने एकहाती मालिका संपवली’, दुसरा टी२० सामना पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
“मी चुकांमधून शिकलोय”, इंग्लंड दौऱ्यावर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूने व्यक्त केल्या भावना