भारत-ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी सिडनीला रवाना झाले आहेत. ७ जानेवारीपासून या सामन्याची सुरुवात होणार आहे. हा सामना २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित खेळवला जाईल. तत्पुर्वी भारतीय संघाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सुदैवाने सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. तरीही भारतीय संघाला कोरोना प्रोटोकॉलमुळे सिडनीच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय संघाला वाटत आहे की, ऑस्ट्रेलियामध्ये त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही.
भारतीय संघाच्या सूत्रांनी याविषयी क्रिकेट वेबसाइट क्रिकबझला माहिती दिली आहे. “जर स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो, तर भारतीय क्रिकेटपटूंना मोकळेपणाने जगण्याची परवानगी द्यायला हवी. याउलट क्रिकेट आस्ट्रेलियाने आम्हाला सिडनीला गेल्यानंतर सरळ हॉटेलमध्ये जा आणि क्वारंटाईनमध्ये रहा, असा आदेश दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, आमची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असूनही आम्हाला क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आम्हाला प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांप्रमाणे वागणूक देत आहे.”
साधारण नागरिकांप्रमाणे नियमांचे पालन करू
तसेच पुढे बोलताना सूत्राने माहिती दिली की, “आम्हाला सिडनीत सांगण्यात येणाऱ्या सर्व नियमांचे आम्ही पालन करू. आमची इच्छा आहे की आम्हीही ऑस्ट्रेलियातील साधारण नागरिकांप्रमाणे सर्व नियमांचे पालन करावे. जर दर्शकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नाही दिली जाणार, तरच आम्हाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात काहीतरी अर्थ आहे.”
सिडनी-ब्रिस्बेनमध्ये खोलीबाहेर जाण्याची परवानगी नसेल
“क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल टीमने मागील आठवड्यात आम्हाला हॉटेलमधील खोलीच्या बाहेर न निघण्याचे कठोर निर्देश दिले होते. खासकरु सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये आम्हाला या नियमाचे पालन करावे लागणार होते. भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांच्या गोष्टीचा स्विकारदेखील केला होता. पण त्यानंतर लगेचच भारतीय संघ व्यवस्थापनाने त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला,” असे पुढे सूत्राने सांगितले.
क्विन्सलँड सरकारची सूचना
नुकताच चौथ्या कसोटी सामन्याच्या ठिकाणावरुन वाद पेटला आहे. भारतीय संघाला क्वारंटाइन नियमामुळे ब्रिस्बेनच्या स्टेडिमवर चौथा कसोटी सामना खेळायचा नाही. कारण तिथे त्यांना सराव सत्राव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अशात क्विन्सलँड सरकारने सांगितले आहे की, जर भारतीय संघाला त्यांच्या नियमांनुसार चालायचे नसेल, तर त्यांनी चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला येऊ नये.
रोहितसह पाच भारतीय खेळाडूंचा चालू आहे तपास
मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करताना पाच भारतीय खेळाडूंनी चाहत्याची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना एकांतवासात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एकांतवासात ठेवण्यात आलेल्या ५ खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, शुबमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. तसेच त्यांना भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघापासून वेगळे करण्यात आले होते. तसेच त्यांनी जैव सुरक्षित वातावरणातील नियमांचा भंग केला आहे का नाही, याचा तपास चालू होता.
याविषयी भारतीय संघाच्या सूत्राने म्हटले की, “सर्व खेळाडू पावसामुळे हॉटेलमध्ये बसून जेवण करत होते. त्यानंतर काही भारतीय खेळाडूंना एकांतवासात ठेवण्यात आले. ही गोष्ट माझ्या विचारांपलीकडची होती. आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही त्यांना सिडनीसाठी जाणाऱ्या विमानात इतर भारतीय खेळाडूंपासून वेगळे बसायला सांगितले आहे.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूंनी केलाय मोठा त्याग
भारतीय संघ आयपीएल २०२० नंतर सलग क्वारंटाइनमध्ये राहिला आहे. याविषयी बोलताना सूत्राने सांगितले की, “आमच्या खेळाडूंनी या दौऱ्यावर खूप त्याग केला आहे. जसे की, मोहम्मद सिराजच्या वडीलांचे निधन झाले तरीही त्याला घरी जाता आले नाही. आमचे इतर खेळाडूही गेल्या सहा महिन्यांपासून सलग जैव सुरक्षित वातावरणात राहिले आहेत. हे सोपे नसते.”
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND: सिडनी कसोटीसाठी ‘एवढ्या’ प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी
आनंदाची बातमी! रोहित, पंतसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह
ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर; भारताविरुद्ध २० विकेट्स घेणारा ‘हा’ गोलंदाज सिडनी कसोटीतून बाहेर