मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडू भारतीय संघावर नेहमीच टीका टिप्पणी करत असतात. टीका करणे हा त्यांच्या सवयीचा भाग झाला आहे. आता पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक याने यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीवर निशाणा साधला आहे.
अब्दुल रजाक म्हणाला की, पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी क्वालिफाय होऊ नये यासाठी इंग्लंडविरुद्ध जाणून बुजून हारला होता. सामना संपल्यानंतर सारे लोक आणि खेळाडू भारताच्या या रणनीतीविषयी असेच बोलत होते. धोनी अत्यंत संथगतीने फलंदाजी करत होता. ३१ चेंडूत ४२ धावा काढणार्या महेंद्रसिंग धोनीने केदार जाधव आक्रमक खेळताना त्याला रोखले असा धक्कादायक आरोप रज्जाकने केला.
पाकिस्तानचा संघ इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्याच्यावेळी भारत विजयी होऊ दे अशी प्रार्थना करत होता. कारण इंग्लंड हरला असता तर पाकिस्तानचा संघ नॉकआउटमध्ये पोहोचला असता आणि इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला असता. मात्र तसे झाले नाही या सामन्यात भारताचा पराभव झाला. इंग्लंडचा संघ विजयामुळे नॉकआऊटमध्ये पोहोचला आणि पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले.
या सामन्यात इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी ३३८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोहलीच्या संघ ५० षटकात ३०६ धावा करू शकला. रोहित शर्माचे शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही भारतीय संघाचा ३१ धावांनी पराभव झाला.
यापूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानेही रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. कोहली, धोनी आणि रोहित यांनी विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्न न केल्याचा आरोप केला.