भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 सामना बुधवारी (2 नोव्हेंबर) एडिलेडच्या ओव्हल स्टेडियवर खेळला गेला. उभय संघांतील ही लढत शेवटच्या चेंडूपर्यंत चालली. अखेर भारतीय संघाने पाच धावांच्या अंतराने विजय मिळवला. या विजय भारतीय संघासाठी अनेक कारणांसाठी महत्वाचा होता. पहिले म्हणजे या विजयानंतर भारत टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी जवळपास पात्र झाला आहे. तसेच दुसरे म्हणजे भारतीय संघाच्या नावावर काही खास विक्रमांची नोंद देखील झाली. यातील एका विक्रमात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला मागे टाकत यादीत आघाडी घेतली.
भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये आतापर्यंत एकूण चार सामने जिंकले आहेत आणि त्यातील तीन सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला. रविवारी (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला विश्वचषकाच्या चालू हंगामातील पहिला पराभव मिळाला. मात्र, बुधवारी संघाने पुन्हा पुनरागमन केले आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर टी-20 विश्वचषकाच्या आतापर्यंत संर्वाधिक विजय मिळवणारा दुसरा संघ बनला आहे. या यादीत पहिला क्रमांक श्रीलंकन संघाचा आहे.
टी-20 विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्यांमध्ये 31 विजयांसह श्रीलंका पहिल्या क्रमांकावर आहे. यादीतील दुसऱ्या क्रमांवर असलेला भारतीय संघ आतापर्यंत 26 सामने जिंकला आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा पारंपारिक विरोधक पाकिस्तान आहे. पाकिस्तानने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत एकूण 25 सामने जिंकले आहेत. भारत आणि पाकिस्तान संघ बुधवारपूर्वी या यादीत बरोबरीवर होते. पण बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारताने आघाडी घेत पाकिस्तानला मागे टाकले आहे.
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
31 – श्रीलंका
26 – भारत*
25 – पाकिस्तान
दरम्यान, बांगलादेशविरुद्ध एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये भारतीय संघ 6 विकेट्सच्या नुकसानावर 184 धावा करू शकला. प्रत्युत्तरा बांगलादेशने सुरुवात चांगली केली, पण तितक्यात पावसाने बाधा आणली. पावसामुळे सामना काही वेळ थांबवला गेला आणि पंचांनी दुसऱ्या इनिंगमध्ये 16 षटकांचा खेळ होणार असल्याचे जाहीर केले. याच कारणास्तव बांगलादेशचे लक्ष्य 185 ऐवजी 151 केले गेले. बांगलादेशला शेवटच्या षटकात 20 धावांची आवश्यकता होती. पण त्यांचे फलंदाज हे लक्ष्य गाठू शकले नाहीत. विजयासाठी पाच धावा कमी पडल्यामुळे बांगलादेश या सामन्यात पराभूत झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितचंच चुकलंय! अजय जडेजांनी ‘या’ खेळाडूंवर फोडले दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पराभवाचे खापर
दुबळ्यांविरूद्धच दादा! मागील तीन टी20 विश्वचषकात रोहित बड्या संघासमोर ‘सुपरफ्लॉप’