मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याचा आज (२८ डिसेंबर) तिसरा दिवस चालू आहे. भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांनी ५ बाद २७९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. रहाणे आपले कसोटी शतक पूर्ण केल्यानंतर दीडशतकी खेळीकडे वाटचाल करत होता. मात्र जडेजाच्या चुकीमुळे रहाणे धावबाद होत मैदानाबाहेर पडला. कसोटीत धावबाद होण्याची ही रहाणेची पहिलीच वेळ होती.
असा झाला रहाणे धावबाद
झाले असे की, रहाणे आणि जडेजा सावधनीने खेळत संघाचा डाव पुढे नेत होते. ९९व्या षटकापर्यंत जडेजाच्या ४९ धावा झाल्या होत्या. त्यामुळे तो अर्धशतक पूर्ण करण्याच्या घाईत होता. डावातील १००वे षटक टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन आला होता. त्याने आपल्या षटकातील पहिल्या चार चेंडूवर जडेजाला एकही धाव घेऊ दिली नाही. त्यानंतर पाचव्या चेंडूवर जडेजाला एक धाव घेण्याची संधी दिसली त्यामुळे तो वेगाने धावला. परंतु जडेजाने मारलेला चेंडू जास्त दूर गेला नव्हता. तरीही सहकाऱ्याला साथ देण्यासाठी रहाणेने धोकादायक धाव घेण्याचे ठरवले.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी या सुवर्णसंधीला हातून निसटू दिले नाही. मार्नस लॅब्यूशानेने पटकन चेंडू पकडला आणि यष्टीरक्षक टीम पेनच्या दिशेने फेकला आणि पाहता-पाहता पेनने रहाणेनेला चपळाईने धावबाद केले. त्यामुळे १२ चौकारांच्या मदतीने ११२ धावा करत रहाणे पव्हेलियनला परतला.
महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत धावबाद होण्याची ही रहाणेची पहिलीच वेळ होती.
This is the first time that Ajinkya Rahane has been dismissed run-out in Tests. #AUSvIND
— Umang Pabari (@UPStatsman) December 28, 2020
या सामन्याआधी कसोटी क्रिकेट इतिहासात आतापर्यंत केलेल्या २०० भागीदारींमध्ये रहाणे एकदाही धावबाद न होणारा पहिला आणि एकमेव फलंदाज होता. यादरम्यान त्याने आपल्या संघसहकाऱ्यालाही धावबाद केले नव्हते. पण रहाणेच्या या मोठ्या विक्रमाला २०२० या वर्षाचे ग्रहण लागले. रहाणेने यावर्षी स्वत:च्या चुकीमुळे एक नव्हे, तर दोन फलंदाजांना धावबाद केले आहे आणि नुकताच तो स्वत:देखील धावबाद झाला आहे.
विराट कोहलीला केले होते धावबाद
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रहाणेमुळे विराट कोहलीने आपली विकेट गमावली होती. या सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट आणि रहाणेच्या जोडीने मिळून ८१ धावांची भागीदारी केली होती. यात विराटच्या ७४ धावांच्या दमदार खेळीचा समावेश होता. पण ७६.६ षटकात रहाणेने एक धाव घेण्याचे संकेत देऊनही धाव पूर्ण केली नसल्यामुळे विराटने विनाकारण आपली विकेट गमावली.
डावाच्या ७७व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रहाणेने साधारण शॉट मारला. या चेंडूवर एक धाव घेण्याच्या उद्देशाने त्याने विराटला धावण्याचा इशारा केला. पण त्यानंतर रहाणे धावलाच नाही. मात्र विराट धाव पूर्ण करण्यासाठी पळाला होता. तेवढ्यात ऑस्ट्रलियन खेळाडूंनी चेंडू पकडला व स्टंपच्या दिशेने फेकला आणि विराट धावबाद झाला.
विराटपूर्वी रिषभ पंतला केले होते धावबाद
विराटपूर्वी रिषभ पंतला रहाणेच्या चुकीमुळे आपली विकेट गमवावी लागली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ही घटना घडली होती. या सामन्याच्या पहिल्या डावातील ५८.२ षटकात स्ट्राईकवर असलेला रहाणे एक धाव घेण्यासाठी धावला. पण क्षेत्ररक्षकाने वेगाने तो चेंडू पकडला असल्याचे पाहून नॉन स्ट्राइकवर असलेला पंत धाव घेण्यासाठी विचार करत होता. पण रहाणे तोपर्यंत क्रीजच्या खूप पुढे आल्याचे पाहून पंतला धावेसाठी पळावे लागले आणि तो केवळ १९ धावांवर धावबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूला धावताना झाली होती दुखापत, आता झाला दोन आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर