भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (८ जुलै) ब्रिस्टॉल येथे कौंटी क्रिकेट मैदानावर होणार आहे.
१-१ अशा बरोबरीत असलेली टी-२० मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने कुलदीप यादवचे पाच बळी आणि केएल राहुलच्या शतकाच्या जिवावर इंग्लंडचा आठ गडी राखून धुव्वा उडवला होता.
तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताला १४८वर रोखत रंगतदार झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात भारतावर विजय मिळवला होता.
पहिल्या सामन्यातील भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला कुलदीप यादव या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्याचबरोबर पहिल्या सामन्यातील शतकवीर राहुलही स्वस्तात बाद झाला होता.
दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ कुलदीप यादवसीठी खास रननीती आखून मैदानात उतरला होता. त्यामध्ये ते यशस्वी देखिल झाले होते.
भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय प्राप्त करुन मालिका जिंकायची असेल तर गोलंदाजी बरोबर भारताच्या फलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
पहिल्या दोन्ही सामन्यात भारताच्या सलामीवीरांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. दुसऱ्या सामन्यात तर भारतीय संघाने पॉवर प्ले मध्येच ४४ धावांवर ३ फलंदाज गमावले होते.
तर तिकडे इंग्लंड संघाच्या सलामीवीरांंनी सावध सुरवात करत चांगली फलंदाजी केली आहे.
तर गोलंदाजीत पहिल्या सामन्यात भारताचे दोनच फलंदाज बाद करण्यात यश मिळवलेल्या इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत भारताला १४८ धावसंख्येत रोखले होते.
भारतीय गोलंदाजांची कामगिरीही तशी वाईट झाली नाही. पहिल्या सामन्यात कुलदीपने ५ बळी घेतले होते तर दुसऱ्या सामन्यात उमेश यादव आणि भुवनेश्वरने चांगली कामगिरी केली होती.
आजच्या सामन्यात इंग्लंड समोर पुन्हा एकदा भारताच्या फिरकी गोलंदाजांचे आव्हान असेल.
तर भारतीय संघाला सगळ्याच क्षेत्रात आपल्या कामगिरीत थोडीशी सुधारणा करावी लागणार आहे.
आजचा सामना जिंकत टी-२० मालिका खिशात टाकण्यासाठी दोन्ही संघ आतुर असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नईच्या तीन वर्षीय ज्यूनियर धोनीच्या सिनियर धोनीला कूल शुभेच्छा






