भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने मागील महिन्यातच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्याने राजकारणाच्या पीचवर आपली दुसरी इनिंग सुरू केले. अशोक दिंडाने भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांसाठी तो भाजपचा प्रचार करतो आहे.
याच दरम्यान त्याने एक महत्त्वाचे विधान केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गांगुली भाजपात आल्यास पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसचा सफाया होईल, असे विधान अशोक दिंडाने केले आहे.
गांगुलीच्या भाजप प्रवेशावर दिंडाचे भाष्य
यंदाच्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत अशोक दिंडा भाजपकडून मोयना मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. याच पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत दिंडा म्हणाला, “जर दादा (सौरव गांगुली) भाजपात आला तर तृणमूल कॉंग्रेस ‘क्लीन बोल्ड’ होऊन जाईल. आम्ही केवळ २०० जागांवर जिंकण्याचा नाही तर सगळ्यांच जागांवर जिंकण्याचा प्रयत्न करू. दादाने मला क्रिकेटच्या मैदानावर साथ दिली आहे. तशीच साथ राजकारणातही मिळावी, अशी माझी इच्छा आहे.”
गांगुलीच्या भाजप प्रवेशावर दीर्घ काळापासून चर्चा
सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशावर दीर्घ काळापासून चर्चा सुरू आहे. विशेषतः बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर गांगुलीची नियुक्ती झाल्यापासून या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र अद्याप गांगुलीने याबाबत कुठलेही पाऊल उचलले नाहिये. त्यामुळे येत्या काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घडामोडी घडणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अय्यर नसताना रहाणेच्या हाती दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वाची धुरा, सोशल मीडियावर मागणीला जोर
नव्वदीत बाद झालेल्या डिकवेल्लाने गाळले नावातील ‘K’ अक्षर, कारण गुलदस्त्यात