ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतीय संघाने वनडे मालिका गमावली आहे. भारतीय संघाच्या वनडेतील सलग पराभवांचे सर्वात मोठे कारण रोहित शर्माची निवड न होण्याचे म्हटले जात आहे. आयपीएल २०२० दरम्यान भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती. रोहित शर्माला दुखापतग्रस्त सांगून संघातून वगळण्यात आलेले. मात्र, त्यानंतर रोहितने आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळताना अर्धशतक झळकावले होते. सोबतच मुंबई इंडियन्सला त्याने पाचव्यांदा विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर, त्याचा समावेश भारताच्या कसोटी संघात करण्यात आला. परंतु, आता ऑस्ट्रेलियातील क्वारंटाईन नियमांमुळे रोहित पहिल्या दोन कसोटींमध्ये खेळू शकणार नाही. याप्रकरणी, माजी भारतीय खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गौतम गंभीर यांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत.
ही बीसीसीआयची मोठी चूक आहे
भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये समाविष्ट असलेल्या लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले, “रोहित शर्माच्या मुद्द्यावरून बीसीसीआयने खूप मोठी चूक केली आहे. रोहित शर्माला संघासह पाठवायला हवे होते. मी निवडकर्ता असतो, तर त्याला संघात सामील करून घेतले असते आणि त्याच्या नावासमोर तंदुरुस्त झाल्यावर खेळेल, असा शेरा लिहिला असता. आता जर तुम्ही रोहितला ऑस्ट्रेलियाला पाठवले, तर नियमांनुसार तो खोलीच्या बाहेरही येऊ शकत नाही. याबाबत बीसीसीआयने आधीच विचार करायला हवा होता.”
ही खूप सोपी प्रक्रिया होती
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही या प्रकरणांमध्ये बीसीसीआयला दोषी ठरवले. गंभीरने आपले मत मांडताना म्हटले, “रोहितच्या निवडीची अगदी सोपी प्रक्रिया होती. यामध्ये जास्त लोकांना सामील करून घेण्याची गरज नव्हती. भारतीय संघाचा फिजिओ, मुख्य निवडकर्ता व मुख्य प्रशिक्षक यांच्यात ताळमेळ असता, तर ही गोष्ट इतकी वाढली नसती. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोहलीला सर्व प्रकरण सांगितलेच असते.”
रोहितला झाली होती दुखापत
आयपीएलच्या साखळी सामन्यादरम्यान रोहितला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला होता. त्यानंतर त्याने तीन सामन्यातून विश्रांती घेतली होती. पुढे तो आयपीएलच्या अंतिम सामन्यासह तीन सामने खेळला. इतर संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर, रोहितने काही काळ राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतले. तो लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, अशा बातम्या येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”
ट्रेंडिंग लेख-
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत