मुंबई । कोरोना या महाभयानक विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस हा विषाणू आपली मगरमिठी घट्टपणे आवळत आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्वीप्रमाणे जनजीवन कधी सुरळीत होईल याबाबत कुणालाच माहीत नाही.
कोरोना विषाणूवर लस आल्यानंतरच सर्व काही सुरळीत होईल, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.
गांगुली पुढे बोलताना म्हणाले की, कोरोनाने संपूर्ण जगाला मेटाकुटीला आणले आहे. सध्या त्याच्यावर कोणतीच लस आली नाही. येत्या सहा ते सात महिन्यांत यावर लस येईल. लस आली की उपचार करणे सोपे होईल. त्यानंतर जनजीवन सुरळीत होईल. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर क्रिकेटच्या सर्वच वेळापत्रकात बदल होईल. क्रिकेटला पुन्हा पूर्वीसारखे दिवस येण्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसीकडून नव्या योजना आखल्या जातील.
कोरोनानंतर क्रिकेट जोरदार पुनरागमन करेल. पण त्यावेळी खेळाडूंपुढे वेगवेगळ्या आव्हाने असतील. प्रत्येक खेळाडूची मेडिकल टेस्ट होईल. पण त्यामुळे खेळात कोणतीही बाधा येणार नाही, असेही सौरव गांगुली म्हणाले. कोरोनामुळे क्रिकेटच्या सर्व मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. या मालिका पुढे ढकलल्यामुळे सर्वच क्रिकेट बोर्डाला आर्थिक फटका बसत आहे. या अर्थ संकटातून सावरण्यासाठी क्रिकेट लवकर सुरू होणे गरजेचे आहे.