रविवारी (१७ ऑक्टोबर) आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची ही शेवटची स्पर्धा असणार असणार आहे. त्यानंतर राहुल द्रविड ही जबाबदारी स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर,मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा देखील प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ समाप्त होऊ शकतो. भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. तर आर श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्षेत्ररक्षकांचा स्तर उंचावला आहे. परंतु, माध्यमातील वृत्तानुसार, या दोघांनी काम इथेच थांबवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी
भारतीय वेगवान गोलंदाजांनी गेल्या ५ वर्षात भारतात आणि परदेशातही अप्रतिम कामगिरी केली आहे. यामागील प्रमुख कारण भरत अरुण आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत जगातील दिग्गजांकडून वाहवा मिळवली आहे.
भारतीय संघाने गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांना त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले आहे. यामध्ये वेगवान गोलंदाजांचा मोलाचा वाटा आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, टी नटराजन आणि उमेश यादव यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत टाकले.
तसेच गेल्या काही वर्षात भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा स्तर देखील भरपूर उंचावला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे आर श्रीधर यांनी खेळाडूंवर घेलतेली मेहनत. भारतीय संघ सध्या गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक आहे. बीसीसीआयचे देखील असे म्हणणे आहे की, या दोघांनी ही आपला प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरू ठेवावा. परंतु त्यांनी वैयक्तिक कारणास्तव असे करण्यास नकार दिला आहे.
भरत अरुण आणि आर श्रीधर यांनी दोघांनी मिळून चांगली कामगिरी केली होती. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना जे हवं ते करण्याची मुभा दिली जात होती. परंतु, नवीन मुख्य प्रशिक्षक आल्यानंतर त्यांना असे करायला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. तरीदेखील बीसीसीआयचे काही अधिकारी भरत अरुण यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कोहलीआधी पुजारा बनला चँपियन, कोणत्या जगात राहतोय आपण!’, सीएसकेचा विजय अन् पुजारा होतोय ट्रेंड
फटाक्यांची आतषबाजी अन् फुलांची उधळण, सीएसकेच्या ऋतुराजचे पुण्यात धूमधडाक्यात स्वागत
वुई आर द चेन्नई बॉईस! जडेजा-ब्रावोने गाणं गात साजरा केला चेन्नईचा विजय