कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेविरूद्ध गोलंदाजी करताना भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या एकदा नव्हे तर दोनदा पाठदुखीने त्रस्त झाला होता.
दुसर्या एकदिवसीय सामन्यात त्याने 4 षटके टाकून 20 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. कमी षटके फेकणारा आणि आपल्या तंदुरुस्तीबद्दल चिंताग्रस्त असलेला हार्दिक पांड्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार की नाही?, याविषयी क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आता भारतीय संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने त्याच्या तंदुरुस्तबद्दल माहिती दिली आहे, जी सर्वच चाहत्यांसाठी आनंददायक आहे.
भुवनेश्वर कुमारने हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीबद्दल कोणतीही चिंता नसल्याचे सांगितले आहे. दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने तीन गडी राखून विजय मिळविल्यानंतर तो म्हणाला की, “मला माहित आहे की त्याला आतापर्यंत कोणतीही अडचण नाही आणि त्याच्या तंदुरुस्तीची चिंता करण्याची काहीच गरज नाही. मला खात्री आहे की तो ठीक आहे.” तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत करून भारतीय संघाने मालिका ताब्यात घेतली असून शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाईल.
परंतु या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी आतापर्यंत फारशी चांगली राहिली नाही आणि अष्टपैलू म्हणून त्याला तितकासा प्रभाव सोडता आलेला नाही. सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी हार्दिक पांड्याची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. कारण वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून त्याची उपस्थिती भारतीय संघाला उत्तम समतोल देते.
हार्दिक हा टी20 विश्वचषक 2021 साठी महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याला पूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. भारतीय संघाचे माजी खेळाडू लक्ष्मण शिवरामकृष्णन हार्दिकबद्दल म्हणाले होते की, “जर तो संपूर्ण तंदुरुस्तीने खेळला तर कोणत्याही सामन्यात भारतीय संघाच्या विजयाच्या अपेक्षा दुप्पटीने वाढतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यावरील पहिला सराव सामना अनिर्णित, ‘या’ खेळाडूंनी दाखवला दम
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना? जाणून घ्या सर्वकाही