नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेला दुसरा टी२० सामना युवा भारतीय फलंदाज इशान किशन याच्यासाठी खूप विशेष राहिला. या सामन्याद्वारे २२ वर्षीय इशानने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. याबरोबरच पदार्पणाच्या सामन्यात अफलातून अर्धशतक करत त्याने सर्वांची मने जिंकली. यानंतर चहूबाजूंनी इशानच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. अशात स्वत: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इशानच्या वडिलांकडे त्यांची प्रशंसा केली आहे.
बिहारच्या पाटणा शहरातील जन्म असलेल्या इशानने आयपीएलमधील त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत भारतीय संघात जागा मिळवली. त्याला सलामीवीर शिखर धवनच्या जागी दुसऱ्या टी२० सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत त्याने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. दरम्यान ४ षटकार आणि ५ चौकार मारले. त्याच्या या जबरदस्त कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
इशानच्या या प्रशंसनीय कामगिरीचा प्रभाव राजकारण क्षेत्रातील व्यक्तींवरही पडला. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी इशानचे वडील प्रणव पांडे यांना कॉल करुन त्यांच्या लेकाचे कौतुक केले आहे. त्यांनी इशानच्या यशासाठी त्याचे अभिनंदन केले असून उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर बिहारचे मंत्री संजय झा यांनी प्रणव यांची भेट घेत इशानचे कौतुक केले आहे.
इशानच्या कामगिरीमुळे त्याचे आई-वडील देखील खूप आनंदी आहेत. भारताने दुसरा टी२० सामना जिंकल्यानंतर त्याच्या घरी जल्लोषाचे वातावरण आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ही कसली दुविधा! तिसऱ्या टी२० सामन्यात रोहितला संधी दिल्यास भारताचं ‘मोठं नुकसान’, पाहा कसं
पदार्पण केलं पण फलंदाजी राहिली, तिसऱ्या टी२०त सूर्यकुमारसाठी बलिदान देणार का कोहली?
झिम्बाब्वे क्रिकेटची ‘वन मॅन आर्मी’ म्हटला जाणारा हिथ स्ट्रीक