रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्या 3 विकेट्स 16 षटकांच्या आतच गमावल्या. यामध्ये मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या विकेटचा समावेश होता.
अगरवाल आणि पुजाराला कागिसो रबाडाने बाद केले. तर विराटला एन्रीच नॉर्जेने बाद केले. विशेष म्हणजे नॉर्जेची ही कसोटी कारकिर्दीतील ही पहिलीच विकेट ठरली आहे. त्यामुळे कसोटी कारकिर्दीत विराट कोहलीच्या रुपात पहिली विकेट घेणारा एन्रीच चौथा गोलंदाज ठरला आहे.
याआधी कागिसो रबाडा, अल्झारी जोसेफ आणि सेनुरान मुथुसामी यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट विराटची घेतली होती.
सध्या सुरु असलेल्या रांची कसोटीत भारताने पहिल्या 3 विकेट झटपट गमावल्यानंतर सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सांभाळला असून या दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली आहेत.
विराट कोहली ठरला आहे या गोलंदाजांची कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट –
कागिसो रबाडा – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, मोहाली 2015
अल्झारी जोसेफ – वेस्ट इंडीज विरुद्ध भारत, अँटिग्वा, 2016
सेनुरान मुथुसामी – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, विशाखापट्टणम, 2019
एन्रीच नॉर्जे – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, रांची, 2019