सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. तिसऱ्या सामन्यानंतर भारत मालिकेत २-१ अशा आघाडीवर असून चौथा सामना कमीत कमी अनिर्णित ठेवून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यास पात्र ठरेल. मात्र, या चौथ्या सामन्यातून भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने माघार घेतली आहे. तसेच, इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी त्याला आराम देण्यात आला आहे. तसेच नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, बुमराह वनडे मालिकेला देखील मुकण्याची शक्यता आहे.
वनडे मालिकेतही दिसणार नाही बुमराह
चौथ्या आणि महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यातूश बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. तसेच, अहमदाबाद येथे होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतही तो खेळताना दिसणार नाही. एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळाच्या बातमीनुसार, बुमराह इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही न खेळण्याची शक्यता आहे.
वनडे मालिकेतील तीनही सामने पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर विनाप्रेक्षक खेळविले जातील. ही मालिका २३ मार्चपासून सुरु होईल. बुमराह या मालिकेत सहभागी न झाल्यास इतर युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.
भारतीय खेळाडू योयो चाचणीत फेल
टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेला तमिळनाडूचा युवा क्रिकेटपटू वरुण चक्रवर्ती हा योयो टेस्टमध्ये फेल झाला. त्यामुळे त्याला,देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. वरूणला यापूर्वी देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी टी नटराजनला संधी देण्यात आली.
वरूणव्यतिरिक्त आणखी एक खेळाडू या चाचणीत फेल झाल्याचे सांगण्यात आले आहे. टी२० मालिकेसाठी आणखी १० दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने या दोन्ही खेळाडूंना पुन्हा एकदा योयो टेस्ट देण्याची संधी मिळेल. त्यानंतर, पुढील निर्णय घेण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या –
आर अश्विनसह ‘या’ खेळाडूंना फेब्रुवारी महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन
अंडर १९ वर्ल्डकपचे ‘हे’ ५ हिरो टीम इंडियाकडून एखादा सामना खेळण्याची पाहताय वाट
विराटबरोबर २००८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळलेले खेळाडू सध्या काय करतात, वाचा