टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचं नाव जवळपास पक्कं आहे. आता केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. गंभीरनं आयपीएल 2024 मध्ये कोलकाताला त्याच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन बनवलं होतं. आता जर तो टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला तर त्याच्यासमोर एक-दोन नव्हे तर अनेक आव्हानं असतील.
नवीन कर्णधाराला तयार करणं – गेल्या 10 ते 15 वर्षांचा आढावा घेतला तर, टीम इंडियाचा पुढचा कर्णधार जवळपास निश्चित होता. धोनीनंतर कोहलीच कर्णधार होणार हे निश्चित होतं. तर कोहलीनंतर अनुभवी रोहित शर्मानं टीम इंडियाची कमान हाती घेतली. मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहे की, रोहित शर्मानंतर संघाची धुरा कोण सांभाळणार? रोहित शर्मानंतर नवा कर्णधार शोधण्याचं मोठं आव्हान गंभीरसमोर असेल.
वरिष्ठ खेळाडूंसोबत समन्वय – अनेकदा नव्या प्रशिक्षकाचं संघातील वरिष्ठ खेळाडूंशी पटत नसल्याचं पाहायला मिळतं. अशा परिस्थितीत, प्रशिक्षक बनल्यानंतर गंभीरपुढे हे देखील मोठं आव्हान असणार आहे. मात्र केकेआरसह लखनऊसाठीही मेंटरची भूमिका बजावणाऱ्या गंभीरचा आतापर्यंत कोणत्याही वरिष्ठ खेळाडूसोबत वादाचा इतिहास नाही. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, अनिल कुंबळे जेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते, तेव्हा त्यांचे संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत वाद झाले होते.
आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणं – टीम इंडियानं शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 (चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकली होती. सध्या 2024 चा टी20 विश्वचषक सुरु आहे. टीम इंडिया ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. तरीही टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकून देणं हे गंभीरसाठी मोठं आव्हान ठरू शकतं.
संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत करणं – संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्याचं मोठं आव्हान गंभीरसमोर असेल. संघातील ज्येष्ठ खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंना संधी देणं ही प्रशिक्षकाची मोठी जबाबदारी असते. संघातील वरिष्ठ खेळाडू बाहेर पडल्यानंतर संघात समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियात होणार नव्या विकेटकीपरची एंट्री! मयंक यादवला संधी मिळणार का?
जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचे नवे फिल्डिंग कोच? गौतम गंभीरशी काय चर्चा झाली?
क्रिकेटमधून होते करोडोंची कमाई, गाैतम गंभीरची एकूण संपत्ती जाणून व्हाल थक्क!