रणजी ट्रॉफी २०२१-२२ चे विजेतेपद मध्य प्रदेशने पटाकवले. भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित मध्य प्रदेश संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत असताना संघाने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. प्रशिक्षकाच्या भूमिकेत मध्य प्रदेशसाठी हा त्यांचा पहिला हंगाम होता. प्रशिक्षकाच्या भूमिकेत त्यांनी यापूर्वी विदर्भ आणि मुंबई संघाला विजेतेपद पटकावून दिले आहे. पंडित एक कडक शिस्तीचे प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. स्वतःच्या या कडक स्वभावाविषयी त्यांनी काही दिवसांपूर्वी खास प्रतिक्रिया दिली होती.
मुंबई संघाने सर्वाधिक ४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. पण यावर्षी मध्य प्रदेश संघ मोठ्या काळाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आणि मुंबईला पराभूत करून ट्रॉफी देखील जिंकली.
मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित (ChandraKant Pandit) काही दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले होते की, “मी माझे क्रिकेट मुंबईसाठी खेळले आहे. नशिबाने मी एका महान संघाचा भाग होतो. मी कधीच मोठ्या पातळीवर क्रिकेट खेळले नाही, पण मी त्या संघाचा भाग होतो, ज्यामध्ये सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील आणि अशोक मांकड (Ashok Mankad) होते.”
पंडित म्हणाले की, “मी अशोक मांकडला धन्यवाद म्हणू इच्छितो. कारण त्यांनी मला शिकवले की, संघाचे नेतृत्व आणि त्यांना प्रशिक्षण कसे देतात. विजय मिळण्यासाठी तुम्हाला खास प्रक्रिया अंमलात आणावी लागते. शक्यतो लोकं मला खूप कडक म्हणतात. तुम्हाला महितीये, मी खडूस आहे. पण अशी ओळख बनवणे खूप अवघड आहे. कारण सर्वकाही खेळाडू आणि संघाला चांगले बनवण्यासाठी चालले आहे. सर्व खेळाडू माझा सन्मान करतात. मला नाही माहिती की, माझ्या पाठीमागे ते काय म्हणतात, पण मला त्याची पर्वा नाहीये. कारण नोकरी आणि प्रोफेशन माझ्यासाठी प्राथमिकता आहे.”
मुंबई संघासाठी खेळले आहेत दोन्ही दिग्गज
दरम्यान, अशोक मांकड आणि चंद्रकांत पंडित मुंबई संघाचे एकेकाळचे महत्वाचे खेळाडू राहिले आहेत. मांकड भारतासाठी २२ कसोटी सामने खेळले असून यामध्ये २५ च्या सरासरीने ९९१ धावा केल्या. यामध्ये त्यांच्या ६ अर्धशतकांचा समावेश आहे. एक दिवसीय सामनाही त्यांनी खेळला, ज्यामध्ये ४४ धावांची खेळी केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र मांकडची आकडेवारी चांगली आहे. त्यांनी एकूण २१८ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि यामध्ये ५१ च्या सरासरीने १२९८० धावा केल्या आहेत.
चंद्रकांत पंडितांच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्यांनी भारतासाठी ५ कसोटी सामने खेळले आणि २४ च्या सरासरीने १७१ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ३६ सामने खेळले आणि २१ च्या सरासरीने २९० धावा केल्या. प्रथम श्रेणींमध्ये त्यांना खेळलेल्या १३८ सामन्यांमध्ये ४९ च्या सरासरीने ८२०९ धावा केल्या होत्या. यामध्ये २२ शतक आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे.