भारतीय संघ येत्या जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान त्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौरादेखील करणार आहे. इथे त्यांना मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. यासाठी लवकरच संघाची घोषणा करण्यात येणार आहे.
भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर रवी शास्त्रींच्या अनुपस्थित राहुल द्रविडला प्रशिक्षकपद देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. अशातच सर्वत्र रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांची तुलना केली जाऊ लागली आहे. चला तर पाहूया, या दोघांमध्ये कोणाची कामगिरी प्रशिक्षक म्हणून श्रेष्ठ राहिली आहे?
राहुल द्रविड यांनी भारतीय अंडर १९ आणि भारतीय अ संघासाठी प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु रवी शास्त्री देखील यात फारसे मागे नाहीत.
राहुल द्रविड यांची प्रशिक्षक म्हणून भूमिका
राहुल द्रविड यांनी सुरुवातीला २०१२-१३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक पद सांभाळले होते. ते प्रशिक्षक असताना राजस्थान रॉयल्सने प्लेऑफ गाठले होते. त्यानंतर त्यांनी अंडर-१९ आणि इंडिया ए संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. २०१६ मध्ये त्यांना दिल्ली डेयरडेविल्स संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्याची ऑफर आली होती. परंतु त्यांनी ती फेटाळून लावून अंडर १९ संघाला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. याचवर्षी भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र २०१८ मध्ये आपल्या प्रशिक्षणाखाली त्यांनी भारतीय संघाला चौथ्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकून दिला होता.
साल २०१७ मध्ये अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांचे नाव प्रशिक्षकपदासाठी सुचवण्यात आले होते. परंतु त्यावेळी त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवायचा असल्याने नकार दिला होता. त्यानंतर ते नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
रवी शास्त्री प्रशिक्षक असताना भारतीय संघाची उल्लेखनीय कामगिरी
रवी शास्त्री यांनी २०१७ मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघाने एकूण १७४ सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला ११४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. एकप्रकारे रवी शास्त्रींच्या कारकिर्दीत भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ६५% पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. या कार्यकाळात त्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत राहावे लागणार आहे.
रवी शास्त्रींनी ते केले जे कोणालाच करता आले नव्हते
रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात जाऊन कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. त्यांनी २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये असा कारनामा केला आहे. त्यातही २०२०-२१ मध्ये झालेल्या मालिकेतील गाबा कसोटीत भारतीय संघातील युवा खेळाडूंनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या पत्नीचे विराटशी होते खास नाते, सिनेमा थिएटरबाहेर एकत्र दिसल्याने झाली होती खूप चर्चा
“अनिल कुंबळेने अनेकदा माझी रात्रीची झोप उडवली होती,” सार्वकालिन फलंदाजाचे लक्षवेधी वक्तव्य