मुंबई । बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कालावधी वाढवण्यासाठी बोर्डाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यांमध्ये गांगुली यांनी अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला होता. गांगुली यांचा जुलै तर शहा यांचा जूनमध्ये कालावधी संपणार आहे. त्यानंतर त्यांना तीन वर्षांसाठी कूलिंग ऑफ पिरियडवर जावे लागणार आहे.
नियमानुसार कोणतीही व्यक्ती राज्य क्रिकेट संघ किंवा बीसीसीआयशी सलग सहा वर्ष कोणत्याही पदावर राहिले त्यांना तीन वर्षांसाठी बाहेर राहावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील या नियमांना मंजुरी दिली आहे.
सौरव गांगुली बंगाल क्रिकेट बोर्डासोबत पाच वर्ष तीन महिने त्या पदावर राहिले आहेत तर तर जय शहा हे देखील गुजरात क्रिकेट संघटनेत सचिव म्हणून काम पाहिले आहेत. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली आहे. कुलिंग ऑफ पीरियड या नियमांवर विचार करावा आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढविण्याकरिता परवानगी द्यावी यासाठी ही याचिका दाखल केली आहे.
बोर्डाच्या मते, सौरव गांगुली आणि जय शहा यांना कूलिंग ऑफ पिरियड वर जाण्याचा नियम तेव्हा लागू होईल जेव्हा ते बीसीसीआयमध्ये सलग सहा वर्षे काम करतील. तसेच ज्या लोकांनी ही घटना तयार केली आहे. त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्याचा परिणाम क्रिकेटवर होऊ शकतो असेही याचिकेत म्हटले आहे.