भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरने एका मुलाखतीत अनिल कुंबळेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. गंभीरने यादरम्यान दावा केला की, जर कुंबळेच्या काळात डीआरएस प्रणालीचा वापर केला जात असता तर त्याने ९०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या असत्या.
यादरम्यान त्याने कुंबळेबरोबरच हरभजन सिंगचीदेखील (Harbhajan Singh) प्रशंसा केली. तसेच तो पुढे म्हणाला की, डीआरएसमुळे हरभजन आणि कुंबळे दोघांनाही खूप फायदा झाला असता.
कुंबळेच्या नावावर कसोटीत एकूण ६१९ विकेट्स आहेत. तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. तर तो जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच हरभजनने कसोटीमध्ये भारतीय संघाकडून एकूण ४१७ विकेट्स घेतल्या आहेत.
गंभीरने ‘स्पोर्ट्स तक’शी इंस्टाग्रामवर चर्चा करताना म्हटले की, “जर डीआरएस प्रणालीचा वापर कुंबळेच्या काळी असता, तर त्याने आपल्या कारकीर्दीत ९००पेक्षा अधिक विकेट्स (More than 900 Wickets) घेतल्या असत्या. तसेच हरभजननेही ७०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या असत्या.”
गंभीर पुढे म्हणाला की, “हरभजन आणि कुंबळे दोघेही अनेकवेळा पायचीत करण्यापासून वाचले होते. हरभजनने केपटाऊनमध्ये ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना अधिक चांगल्याप्रकारे गोलंदाजी करता येत नव्हती. विचार करा जर, त्यांना तिथे चांगली गोलंदाजी करता आली असती तर विरोधी संघाला १०० धावाही करता आल्या नसत्या.”
गंभीरने पुढे कुंबळेच्या (Anil Kumble) नेतृत्वाची प्रशंसा केली. तो हेसुद्धा म्हणाला की, कुंबळे असा कर्णधार होता, ज्याच्यासाठी तो जीवही देऊ शकतो. गंभीरने कुंबळेबद्दलचा एक किस्सा सांगितला. ज्यामध्ये कुंबळेमुळे त्याला संघात स्थान मिळाले होते.
गंभीरने २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या मालिकेचा उल्लेख करत सांगितले की, “विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि मी जेवण करत होतो. तेव्हाच कुंबळे माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, तू दोन्हीही मालिकेमध्ये काही झाले तरी सलामीला फलंदाजी करशील. तू आणि सेहवाग ८वेळा एकही धाव न करता बाद झाले तरी काही हरकत नाही.”
गंभीर पुढे म्हणाला की, “मी माझ्या कारकीर्दीत आतापर्यंत अशाप्रकारचे शब्द कोणाकडूनच ऐकले नाहीत. जर मला कोणासाठी स्वत:चा जीवही द्यावा लागला तर कुंबळेसाठी देईल. ते शब्द आताही मला आठवतात.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-एकेवेळी केली टीम इंडियाची सेवा, आता सामन्याचे पासही मिळणे अवघड
-Video: फलंदाजीला येताना एकदा बॅट तर एकदा ग्लोव्ज विसरलेला खेळाडू
-एकेकाळी होते विराटचे संघसहकारी, आज कुणालाही त्यांचं नावही आठवत नाही