आयपीएलच्या 13 व्या हंगामाची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याने झाली. या सामन्यात कर्णधार धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाने पहिला विजय मिळविला. मात्र या हंगामातील चौथ्या सामन्यात चेन्नई संघाचा राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभव झाला. या सामन्यात एमएस धोनीने संथ फलंदाजी केली. होती त्यामुळे सोशल मीडियावर तो बराच ट्रोल झाला होता.
चेन्नई संघात तंदरुस्त खेळाडूंचा आहे अभाव
22 सप्टेंबर रोजी झालेल्या या सामन्याबद्दल सीएसकेचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याने सांगितले, “संघात तंदुरुस्त खेळाडूंचा अभाव आहे. संघाचा कर्णधार एमएस धोनी फलंदाजीसाठी आला तेव्हा फारच कमी चेंडू शिल्लक होते, त्यामुळे चेन्नईने सामना गमावला. तथापि, पुढील सामन्यासाठी संघ तयार आहे. संघाचा कर्णधारही नव्या जोमाने आणि सामर्थ्याने मैदानात प्रवेश करेल.”
क्वारंटाईनमुळे सरावासाठी मिळाला कमी वेळ
सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी म्हणाला, “सामन्याच्या शेवटच्यावेळी मी मैदानावर पोहोचलो, पण षटके कमी असल्यामुळे सामना हाताबाहेर गेला. दोन आठवड्यांच्या क्वारंटाईनमुळे सराव अधिक चांगल्या पद्धतीने करता आला नाही. राजस्थानकडून 216 चे लक्ष्य दिले गेले. वेगळ्या गोष्टी आजमवून पहायच्या होत्या, त्यामुळे सॅम करन आणि केदार जाधव यांना माझ्या आधी फलंदाजीसाठी मैदानात पाठविले.”
ऋतूराज गायकवाडला द्यायची होती संधी
सीएसकेचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाला की, “ऋतुराज गायकवाड आपल्या कारकिर्दीतील पहिला सामना खेळत होता. ऋतुराजला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर संधी द्यायची होती. तथापि, तो मोठा डाव खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याची संघाला मदत होईल.”
संजू सॅमसनमुळे मिळाला विजय
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ विजयानंतर म्हणाला की, “युवा फलंदाज संजू सॅमसनच्या चांगल्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला. त्यांला अधिक स्ट्राईक देण्याची माझी भूमिका होती. त्याने डावात आक्रमक फटके खेळून सामना जिकविण्यास मदत केली.”
या सामन्यात 217 धावांचा पाठलाग करत असताना चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक ७२ धावा केल्या. ही खेळी त्याने 37 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने केली. पण त्याची ही खेळी चेन्नईला विजय मिळवून देऊ शकली नाही.
तत्पूर्वी राजस्थानकडून संजू सॅमसनने 32 चेंडूत 74 धावांची खेळी केली. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथने 47 चेंडूत 69 धावांची खेळी केली. तसेच शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चरने तुफानी फलंदाजी केली. त्याने 8 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 216 धावा केल्या होत्या.