आयपीएल २०२२ पूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी संघांच्या कसरती सुरू झाल्या आहेत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. यात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, अष्टपैलू अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए यांच्या नावाचा समावेश आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंबाबत दिल्ली कॅपिटल्सने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. या तारखेपर्यंत सर्व संघांना त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची माहिती द्यायची आहे. एक संघ जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवू शकतो. यावेळी राईट टू मॅच कार्ड नसेल. म्हणजेच एखादा खेळाडू लिलावात गेला तर त्याला संघात घेण्यासाठी तो पुन्हा विकत घ्यावा लागेल.
संघाचा माजी कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरला मुक्त करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे त्याला संघाचे नेतृत्व करायचे होते. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनाला पंतला कर्णधारपदी कायम ठेवायचे आहे. पंतने आयपीएल २०२१ मध्ये दिल्लीचे नेतृत्व केले होते. दुखापतीमुळे अय्यर या हंगामाच्या पूर्वार्धात खेळला नव्हता. अशा स्थितीत पंतला कर्णधार करण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने प्ले ऑफपर्यंतचा प्रवास केला होता. त्याच वेळी अय्यर दोन हंगामांसाठी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ एकदा प्ले ऑफ आणि एकदा अंतिम फेरीत पोहोचला होता.
दिल्लीने शिखर धवन, कागिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, शिमरॉन हेटमायर, अश्विन या खेळाडूंना कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे, अश्विनने याआधीच त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले होते की दिल्ली संघ त्याला कायम ठेवणार नाही. आयपीएलच्या नियमांनुसार, चार खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी खात्यामधून किमान ४२ कोटी रुपये कापले जातील. लिलावात जाण्यासाठी प्रत्येक संघाकडे ९० कोटी रुपये असतील. खेळाडू राखून ठेवल्यावर ९० कोटी रुपयांमधून पैसे कापले जातील. आयपीएल २०२२ चा लिलाव जानेवारीत होण्याची अपेक्षा आहे. या लिलावाचे मुंबईत आयोजण होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात १० संघ खेळणार आहेत, अशा परिस्थितीत मेगा लिलाव आयोजित करण्यात येईल.