चेन्नई। आज(11 नोव्हेंबर) भारत विरुद्ध विंडीज संघात पार पडलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 अशी जिंकत विंडीजला व्हाईटवॉश दिला आहे.
भारताकडून शिखर धवन आणि रिषभ पंतने अर्धशतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
विंडीजने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्याला 4 धावांवर असताना किमो पॉलने बाद केले.
मात्र त्यानंतर सलामीवीर धवन आणि केएल राहुलने डाव सांभाळला पण या दोघांची भागीदारी रंगत असताना राहुलला 17 धावांवर असताना ओशान थॉमसने बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.
पण यानंतर रिषभ पंतने चौथ्या क्रमांकावर खेळायला येत धवनला भक्कम साथ दिली. या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची शतकी भागीदारी रचली. पण भारताला विजयासाठी 10 चेंडूत 7 धावांची गरज असताना पंतने विकेट गमावली. त्याला 38 चेंडूत 58 धावांवर असताना किमो पॉलने त्रिफळाचीत केले.
मात्र त्यानंतर विंडीजकडून चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन झाले. भारताला शेवटच्या षटकात 5 धावांची गरज होती. यावेळी फॅबियन अॅलेनने चांगली गोलंदाजी केली. भारताला 2 चेंडूत 1 धावेची गरज असताना त्याने चांगल्या लयीत खेळणाऱ्या धवनला बाद केले.
त्यामुळे मनिष पांडेवर विजयी धाव घेण्याची जबाबदारी आली. त्यानेही चूक न करता दिनेश कार्तिकच्या मदतीने ती धाव पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला.
धवनने या सामन्यात 62 चेंडूत 92 धावांची खेळी केली. यात त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले.
तत्पुर्वी विंडीजची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली होती. त्यांचे सलामीवीर फलंदाज शाय हो आणि शिमरॉन हेटमेयरने 51 धावांची सलामी भागीदारी रचली होती. पण युजवेंद्र चहलने सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर होपला(24) बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर काही वेळात चहलने हेटमेयरलाही(26) बाद केले.
यानंतर 13 व्या षटकात वॉशिंगटन सुंदरने दिनेश रामदीनला(15) त्रिफळाचीत करत विंडीजला तिसरा धक्का दिला. परंतू त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले. विंडीजकडून डॅरेन ब्रावो आणि निकोलास पूरनने चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचत विंडीजला 3 बाद 181 धावांचा टप्पा गाठून दिला.
ब्रावोने 37 चेंडूत नाबाद 43 धावा तर पूरनने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 53 धावांची तुफानी खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या:
–चारच धावा केल्या तरी कर्णधार रोहित शर्माने केला हा खास विक्रम
–महिला टी२० विश्वचषक: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे टीम इंडिया
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १४- परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित