पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत मैदानात असो वा मैदानाबाहेर नेहमीच चर्चेचा विषय असायचे. त्यांनी आपल्या तिखट वक्तव्यांनी नेहमीच सर्वांचे लक्ष खेचले. मियाँदाद यांच्याशी निगडीत एका घटनेचा खुलासा भारतीय संघाचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांनी केला आहे. जेव्हा फलंदाजी करताना मियाँदादने दोशी यांना विचारले होते, “तुझ्या खोलीचा नंबर काय आहे? मला तिथे चेंडू मारायचा आहे.”
हे वाक्य आहे तब्बल 38 वर्षांपूर्वीचे, जेव्हा पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता आणि मालिकेतील पहिलाच सामना बेंगळुरू येथे खेळण्यात येत होता. ७२ वर्षीय दोशी (Dilip Doshi) यांनी भारतीय संघाचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिकशी एका व्हिडिओ मुलाखतीत बोलताना त्या वाक्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते.
ते म्हणाले, “जावेद मियाँदाद ((Javed Miandad)) यांचा स्वभाव कोणाशीही लपून राहिलेला नव्हता. त्यांचा ‘स्ट्रीट फायटर’प्रमाणे स्वभाव होता. तरीही ते एक महान फलंदाज होते. मी खरंतर एक प्रतिस्पर्धी म्हणून त्यांचा सन्मान करतो.”
“मैदानाबाहेर आम्ही दोघेही चांगले मित्र होतो. परंतु मैदानात उतरल्यानंतर त्यांचे वेगळेच रूप पाहायला मिळत होते,” असेही ते म्हणाले.
“जेव्हा तुम्ही मियाँदाद यांना शॉट्स मारताना रोखत असायचा, तेव्हा त्यांची चिंता वाढायची आणि ते समोरच्या गोलंदाजाची लय बिघडविण्याचा प्रयत्न करत असायचे. यात ते माहीर होते. असे किरण मोरे यांच्याबरोबर केले, डेनिस लिली यांच्याबरोबर केले आणि त्यांनी माझ्याबरोबर तर अनेकवेळा केले,” असेही मियाँदाद यांच्याबद्दल बोलताना दोशी म्हणाले.
ते म्हणाले, “ते मला भडकविण्यासाठी समोर उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाला काहीतरी म्हणायचे, जेणेकरून माझ्यापर्यंत त्यांचे म्हणणे पोहोचेल. चेंडू फेकल्यानंतर ते मला उकसविण्यासाठी प्रयत्न करायचे.”
“त्या दिवशी बेंगळुरू कसोटी (दोशी यांचा तो शेवटचा कसोटी सामना होता) दरम्यान मियाँदाद यांनी मला म्हटले, ‘तुझ्या खोलीचा नंबर काय आहे? मला तिथे चेंडू मारायचा आहे.’ यानंतर ही मोठी गोष्ट बनली. ही केवळ एक चेष्टा होती. तरीही त्यानंतर त्यांच्या त्या वाक्याला लोकांनी मसाला लावून चांगलेच पसरविले होते,” असेही मियाँदाद यांच्या वाक्याबद्दल बोलताना दोशी म्हणाले.
“त्या सामन्यात मियाँदाद माझ्या गोलंदाजीवर संघर्ष करताना दिसले. त्यांना माझ्या गोलंदाजीवर शॉट्स मारता येत नव्हते. शेवटी त्या डावात मियाँदाद ९९ धावा करत बाद झाले होते, त्यांनी मदनलाल यांना मारलेल्या शॉटवर के श्रीकांतने झेल होता,” असेही ते पुढे म्हणाले.
दोशी यांनी भारतीय संघाकडून एकूण ३३ कसोटी सामने आणि १५ वनडे सामने खेळले. त्यात त्यांनी कसोटीत ३०.७१ च्या सरासरीने ११४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर वनडेत त्यांनी २३.८१ च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २३८ सामने खेळताना तब्बल २६.५८ च्या सरासरीने ८९८ विकेट्स घेतल्या आहेत. दोशी यांनी काऊंटी क्रिकेटमध्येही बरेच सामने खेळले.
हेही वाचा-
स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!