अहमदाबाद। गुरुवारी (१८ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा टी२० सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडला केवळ ८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पण या पराभवाबरोबरच इंग्लंडला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एका कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे.
या सामन्यादरम्यान इंग्लंडने षटकांची गती कमी राखल्याने खेळाडूंना सामना फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्याचे सामनाधिकारी असलेले जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई मंजूर केली आहे. इंग्लंडने निर्धारित वेळेच्या आत षटके पूर्ण केले नाहीत. त्यांना १ षटक टाकण्यास उशीर झाला. त्यामुळे इंग्लंडला या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार षटकांची गती कमी राखल्याबद्दल शिक्षा सुनावली जाते. एका षटाकासाठी २० टक्के दंड अशी शिक्षा सुनावली जाते.
इंग्लंडने त्यांची चूक मान्य केली असून दंडही मान्य केला आहे. त्यामुळे याबद्दल अधिकृत सुनावणी होणार नाही.
इंग्लंडने स्विकारला पराभव
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मात्र भारताचे वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले. पण त्यानंतर सुर्यकुमार यादवने (५७) अर्धशतक पूर्ण केले. तसेच श्रेयस अय्यरने(३७) आक्रमक खेळ केला. त्यामुळे भारताला २० षटकात ८ बाद १८५ धावा करता आल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
भारताने दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जेसन रॉयने ४० धावांची खेळी केली. पण तो बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सने इंग्लंडच्या फलंदाजीची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्याने २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. अखेर त्याचा झंझावात शार्दुल ठाकूरने १७ व्या षटकात संपवला. शार्दुलने स्टोक्सला आणि मॉर्गनला एकापाठोपाठ बाद करत भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले.
बेन स्टोक्स आणि मॉर्गन बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या खालच्या फळीतील फलंदाजांना मोठी कमाल करता आली नाही. केवळ आर्चरने ८ चेंडूत नाबाद १८ धावांसह शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. मात्र त्याला इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवता आले नाही. इंग्लंडने २० षटकात ८ बाद १७७ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
पाचवा सामना निर्णायक –
भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाचवा टी२० सामना शनिवारी (२० मार्च) होणार आहे. हा सामना निर्णायक असेल. कारण मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे पाचवा सामना जो संघ जिंकेल, तो मालिकाही जिंकेल. त्यामुळे हा सामना रोमांचक ठरेल असे अनेकांनी मते व्यक्त केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माने १० वर्षांपूर्वी सुर्यकुमारबद्दल केलेलं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल, पाहा काय होतं ट्विट
“तू खरंच मूर्ख आहेस…”, आपलीच खेळी पुन्हा मोबाईलवर पाहात असलेल्या सुर्यकुमारची पत्नीने उडवली खिल्ली