पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात यजमानांनी पाहुण्या संघाचा ६६ धावांनी धुव्वा उडवला होता. यासोबतच भारतीय संघाने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने पुढाकार घेतला आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज (२६ मार्च ) खेळला जाणार आहे.
मागील सामन्यात भारतीय संघातील मुख्य खेळाडू रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना दुखापत झाली होती.त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. तसेच पहिल्या सामन्यात भारतीय संघ काही गोष्टींमध्ये कमकुवत दिसून आला होता. त्या गोष्टींचा फायदा घेऊन इंग्लंड संघ दुसरा सामना जिंकू शकतात.
रोहित शर्माची अनुपस्थिती :
पहिल्या सामन्यात फलंदाजी करत असताना रोहित शर्माला चेंडू लागून गंभीर दुखापत झाली होती. तसेच रक्त देखील आले होते. या सामन्यातील दुसऱ्या डावात तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील येऊ शकला नव्हता. अशातच रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुबमन गिलला सलामीला जाण्याची संधी मिळू शकते. कसोटी मालिकेत गिलला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे सलामीला येऊन तो लवकर माघारी परतला तर इतर खेळाडूंवर ताण येऊ शकतो. या गोष्टीचा फायदा इंग्लंड संघ घेऊ शकतो.
पावरप्लेमध्ये फलंदाजांना आलेले अपयश :
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने डावाची सुरुवात केली होती. या सामन्यात भारतीय संघाने ३१७ धावांचा डोंगर उभारला होता. परंतु भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती, इंग्लिश गोलंदाजांनी पावरप्लेच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजांवर दबाव बनवून ठेवला होता. त्यामुळे सुरुवातीला भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. त्यानंतर शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल आणि कृणाल पंड्या यांनी आक्रमक फटकेबाजी केली होती.
पावरप्लेमध्ये कमकुवत गोलंदाजीचे प्रदर्शन:
भारतीय संघाने दिलेल्या ३१८ धावांचा पाठलाग करताना,इंग्लिश फलंदाजांनी आक्रमक सुरुवात करून दिली होती. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी अवघ्या १० षटकात ८९ धावा जोडल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांची भूमिका देखील महत्वाची ठरू शकते. जर भारतीय गोलंदाज पावरप्लेच्या षटकांमध्ये याच गतीने धावा देत राहिले तर भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागू शकते.
फिरकी गोलंदाजांना गडी बाद करण्यात येत असलेले अपयश :
पहिल्या वनडे सामन्यात इंग्लिश संघाच्या सलामी फलंदाजांनी भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. कृणाल पंड्याने आपल्या पहिल्याच सामन्यात १० षटक गोलंदाजी करत ५९ धावा दिल्या होत्या. तर कुलदीप यादवने आपल्या ९ षटकात तब्बल ६८ धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांना कमी धावा देत गडी बाद करावे लागणार आहेत. नाहीतर भारतीय संघाला हा सामना गमवावा लागू शकतो.