अहमदाबाद येथे काल (१४ मार्च) भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडचा ७ गडी राखून सहज पराभव केला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका १-१ अशा बरोबरीत आणली. या सामन्यात भारतातर्फे पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने आक्रमक अर्धशतक झळकावत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर, खुद्द इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने ईशानचे कौतुक केले.
ईशानची झंझावती खेळी
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. केएल राहुल खातेही न खोलता तंबूत परतल्यानंतर ईशानने कर्णधार विराट कोहलीसोबत ९४ धावांची भागीदारी केली. ईशानने ३२ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावा ठोकल्या.
मॉर्गनने केले कौतुक
पहिल्या सामन्यात विस्फोटक खेळी खेळणाऱ्या ईशानचे विरोधी कर्णधार ओएन मॉर्गननेदेखील कौतुक केले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, ईशानच्या खेळीविषयी विचारल्यानंतर तो म्हणाला, “तो अशाप्रकारे खेळला यात आश्चर्य काहीच नव्हते. तो ज्या धाडसाने आयपीएलमध्ये खेळतो, तशाचप्रकारे तो इथेही खेळला.”
भारताचा एकतर्फी विजय
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडतर्फे जेसन रॉयने सर्वाधिक ४६ धावा केल्या. कर्णधार ओएन मॉर्गन व बेन स्टोक्सच्या उपयुक्त खेळ्यांमुळे इंग्लंडने १६४ धावांची मजल मारली. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, भारताने पहिल्याच षटकात केएल राहुलचा बळी गमावला. त्यानंतर, ईशान किशन व कर्णधार विराट कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९४ धावा जोडत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. ईशान अर्धशतक करून माघारी परतल्यानंतर रिषभ पंतने १३ चेंडूत २६ धावांची आक्रमक खेळी खेळली. श्रेयस अय्यरसोबत मिळून विराटने भारतीय संघाला विजयी रेषेपार नेले. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (१६ मार्च) खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
ओए बॅट दिखा, बॅट! अर्धशतक झळकावलं अन् इशानला पत्त्याच नाही, मग विराटनं केलं असं काही
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराह चढला बोहल्यावर, लग्नातील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
अफगानी स्पिनर राशिद खानने रचला इतिहास, ठरला २१ व्या शतकातील विश्वविक्रमी गोलंदाज