भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. शुक्रवारी(१९ नोव्हेंबर) मालिकेतील दुसरा टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळी केली आणि विजय मिळवला. भारताचा न्यूझीलंडवर मिळवलेला हा सलग दुसरा विजय ठरला. सध्या भारत २-० अशा अंतराने मालिकेत आघाडीवर आहे. भारताने मिळवलेल्या विजयात कर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंनी महत्वाचे योगदान दिले. आपण या लेखात त्याच पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत.
१. रोहित शर्मा – भारताचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माने मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात संघासाठी महत्वाची खेळी केली. पहिल्या सामन्यात रोहित अर्धशतकापासून अवघ्या दोन धावांच्या अंतरावर असताना बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने या सामन्यात ३६ चेंडूंचा सामना केला आणि ५५ धावा केल्या. यामध्ये त्याचा एक चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. रोहितने केएल राहुलसोबत शतकीय भागीदारी पार पाडली आणि सलामीवीरांनी संघाला एक चांगली सुरुवात दिली.
२. केएल राहुल – भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल मालिकेतील पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झाला होता, पण दुसऱ्या सामन्यात मात्र, तो त्याच्या जुन्या अंदाजात दिसला. त्याने या सामन्यात त्याचे १६ वे अर्धशतक पूर्ण केले. राहुलने या सामन्यात ४९ चेंडूंचा सामना केला आणि ६५ धावा करून तो बाद झाला. यामध्ये त्याच्या सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.
३. हर्षल पटेल – अष्टपैलू हर्षल पटेलने या सामन्यातून भारतीय संघासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने या सामन्यात अंतिम षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये त्याने २५ धावा दिल्या आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याला या कामगिरीसाठी सामनावीर निवडले गेले.
४. रविचंद्रन अश्विन – रविचंद्रन अश्विनने आता भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. त्याने पहिल्या सामन्यात ज्याप्रकारे संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती, अगदी त्याच प्रकारे दुसऱ्या सामन्यातही प्रदर्शन केले आहे. या सामन्यात अश्विन संघासाठी फायदेशीर ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना जास्त धावा करण्यापासून रोखले. त्याने चार षटकांमध्ये १९ धावा दिल्या आणि एक विकेट देखील घेतली.
५. रिषभ पंत – भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मागच्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही एक मोठा शॉट मारून संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने मागच्या सामन्यात अंतिम षटकात चौकार मारून संघाला विजयी केले होते, आता या सामन्यात त्याने सलग दोन षटकार मारून विजय मिळवून दिला आहे. त्याने या सामन्यात ६ चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये १२ धावा करून नाबाद राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितचा ‘हिट’ विक्रम! गेल, आफ्रिदीनंतर ‘असा’ कारनामा करणारा ठरला तिसराच क्रिकेटपटू