सध्याच्या आयपीएल हंगामात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आपला अधिक प्रभाव पाडू शकला नाही. परंतु, संघाने दिल्लीविरूद्धच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत यंदाच्या आयपीएल हंगामातील आपला दुसरा विजय मिळवला. दरम्यान आता भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांचे मत आहे की रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खराब फॉर्ममुळे मुंबई संघाला आयपीएलच्या सध्याच्या हंगामात अजूनही लय सापडली नाही.
मुंबईचा माजी कर्णधार रोहित यंदाच्या आयपीएल हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघात इम्पॅक्ट खेळाडू म्हणूनच खेळत आहे. त्याने 5 सामन्यांमध्ये 0, 8, 13, 17 आणि 18 अशा धावा केल्या आहेत. मुंबईने रविवारी (13 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केले. दरम्यान संघाने 4 पराभव आणि 2 विजयासह सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.
अंजुम चोप्राने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “तुम्ही खराब फॉर्ममध्ये असू शकता. यात काहीही गैर नाही. पण यामुळे संघाला मदत मिळत नाही. त्यामुळे मुंबईला हवी तशी सुरुवात मिळाली नाही.”
पुढे बोलताना अंजुम चोप्रा म्हणाली, “त्यांच्याकडे पर्याय आहेत. रोहितला फलंदाजीच्या क्रमात खालच्या क्रमांकावर पाठवू शकतात. असं नाही की रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाही, अनेकदा तुम्हाला स्पर्धेत चांगली सुरुवात मिळत नाही आणि त्यामुळे एक फलंदाज किंवा एक खेळाडू म्हणून तुमच्यावर परिणाम होतो.”
अंजुम चोप्रा म्हणाली, “खेळात असं होतंच. आपण स्पर्धा पाहतो आहोत, मग ती आयपीएल असो किंवा विश्वचषक. पण मला सांगा, तुम्हाला विश्वचषकात तुमचा सर्वोत्तम फलंदाज फॉर्ममध्ये असावा असं वाटत नाही का? अशा प्रकारच्या कामगिरीसाठी खूप ऊर्जा लागते. अनेक खेळाडू अशा परिस्थितीतून सावरतात आणि पुढच्या स्पर्धांमध्ये पुन्हा जुळवून घेतात. त्याला आयपीएलमध्ये तशी सुरुवात मिळाली नाही. पण आपल्याला माहिती आहे की तो कोणत्या दर्जाचा खेळाडू आहे आणि तो सामना कसा जिंकवू शकतो.”