मुंबई । भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रिया दिल्या. एक दशकाहून अधिक काळ करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर अनेकजण निराश झाले आहेत.
निवृत्तीनंतर एमएस धोनीचे महत्त्व कमी होणार का? असा प्रश्न धोनीचा मित्र अरुण पांडे याला विचारल्यावर तो म्हणाला की, आता धोनी भारतीय सैन्य व्यवस्थेसाठी वेळ देणार आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होणार नाही.
पांडे यांने पीटीआयला सांगितले की, “तो निवृत्तीचा निर्णय घेणार हे मला माहीत होते. पण इतक्या लवकर घेईल असं कधी वाटलं नव्हतं. सुरुवातीला त्याने आयपीएलची तयारी सुरू केली, पण ती पुढे ढकलण्यात आली आणि त्यानंतर टी 20 विश्वचषक पुढे ढकलला गेला. तो मानसिकरित्या मुक्त होण्याचा विचार करत असावा. 15 ऑगस्ट हा सैन्यासाठी खास दिवस असल्याने त्या दृष्टीकोनातून त्याने निवृत्तीचा विचारही केला असावा. टी 20 विश्वचषक पुढे ढकलणे हे त्यांच्या निवृत्तीमागील एक कारण नक्कीच असेल.”
आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदावर असलेल्या धोनीने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर त्याने पॅराशूट रेजिमेंटबरोबर, एका महिन्यापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण घेतले.
तो म्हणाला की, “एक गोष्ट नक्की आहे की तो सैन्याबरोबर अधिक वेळ घालवेल. तो आपले व्यवसाय व इतर प्रतिबद्धतेसाठी देखील वेळ देईल. आम्ही लवकरच एकत्र बसून पुढे जाण्याचा मार्ग ठरवू.”
बहुतांश घटनांमध्ये निवृत्तीनंतर अॅथलीटचे ‘ब्रँड व्हॅल्यू’ कमी होते, पण धोनीचे असे होणार नाही, असे पांडे यांनी आवर्जून सांगितले. तो म्हणाला की, “विश्वचषक स्पर्धेपासून आम्ही 10 नवीन ब्रँडशी करार केला आहे. हे सतत वाढत जाईल, कारण धोनी फक्त क्रिकेटबद्दल नाही तर प्रत्येक क्षेत्रात युवकांसाठी तो आदर्श आहे.”
पुढील दोन किंवा तीन वर्षे खेळेल
“बहुतांश घटनांमध्ये निवृत्तीनंतर अनेक खेळाडूंचे ब्रॅण्ड व्हॅल्यू कमी होते. पण धोनी वेगळा आहे. त्याचे कर्तृत्व वैयक्तिक नाही, त्याची कामगिरी संघासाठी आणि देशासाठी आहेत. धोनी इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील दोन किंवा तीन हंगामात खेळेल. निवृत्तीमुळे आता तो मानसिकरित्या मुक्त होईल. टी -20 विश्वचषक स्थगित होणे, हे त्याच्या निर्णयामागील एक मोठे कारण होते,”असे पांडे यांने सांगितले.