जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला 2019 मध्ये सुरू झाली होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये खेळला जाणार आहे. 2 वर्षांनंतर पहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशीप कोण जिंकेल यावर सगळ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात आपल्याला अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहे. या सामन्याबद्दल अनेक दिग्गज आपली मत स्पष्ट करत आहेत. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही आपले मत व्यक्त केले.
माजी भारतीय दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचे असे म्हणणे आहे की भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज आणि न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्यातील सामना हा बघण्यासारखा असेल. रोहितची क्षमता आणि अलीकडील त्याचा फलंदाजीचा फॉर्म बघता तो इंग्लंडमधील कसोटी सामन्यांमध्ये तो नक्कीच यशस्वी होईल, असे सेहवागचे मत आहे.
पीटीआयशी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला,”ट्रेंट बोल्ट आणि टिम साउथीची जोडी भारतीयांसाठी बरीच आव्हाने मांडेल यात शंका नाही. ते दोघेही चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतात आणि भागीदारीमध्ये गोलंदाजी करतात तेव्हा ते दोघेही उत्कृष्ट असतात. मला बोल्ट विरुद्ध रोहित शर्मा यांच्यातील सामना पाहायला आवडेल. रोहित शर्मा खेळपट्टीवर किती वेळ खेळेल आणि बोल्टच्या नवीन चेंडूंच्या जादू समोर तो कसा खेळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.”
रोहित शर्माला इंग्लंडमध्ये खेळीची सुरवात करण्याची पहिल्यांदा संधी मिळणार आहे. 2014 मधील कसोटी सामन्यांच्या अनुभव त्याला खूप मदद करेल. त्यावेळी त्याने मधल्या फळीत फलंदाजी केली होती.
सेहवाग म्हणाला, “रोहित हा एक दिग्गज फलंदाज आहे आणि 2014 मध्ये तो इंग्लंडमध्येही कसोटी क्रिकेट खेळला आहे, मला वाटते की तो खेळाची सुरवात चांगली करेल, जशी त्याने सध्या केली आहे. तो इंग्लंडमध्ये या वेळी धावा करेल यात शंका नाही. साहजीकच, कोणत्याही सलामीवीराप्रमाणे, पहिल्या 10 षटकांत त्याला खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि परिस्थिती समजून घेऊन नवीन चेंडू खेळावा लागेल. मला खात्री आहे की त्याला त्याचे स्ट्रोक्स खेळण्याची संधी मिळेल. ”
रोहितशिवाय आणखी एक खेळाडू आहे जो सेहवाग इतकी चमकदार फलंदाजी करू शकतो आणि तो आहे रिषभ पंत. इंग्लंडमध्ये यशस्वी होण्यासाठी पंतने त्याच्या पद्धतीने फलंदाजी करावी व त्याच्या तंत्र व पद्धतीविषयी फारसे बदल करू नये अशी सेहवागची इच्छा आहे.
तो म्हणाला, “रिषभ पंतला आपली फलंदाजी इतर कोणापेक्षा त्याला चांगली माहिती आहे आणि माजी क्रिकेटर्स, भाष्यकर्ते आणि माध्यम काय म्हणत आहेत त्याऐवजी तो आणखी काय चांगले करू शकतो यावर त्याने जास्त लक्ष केंद्रित करावे. रिषभचे लक्ष एका वेळी एका चेंडूवर असले पाहिजे. जर चेंडू हिट करण्यास योग्य असेल तर त्याने बाजी मारली पाहिजे. मला असे वाटत नाही की त्याला ते बदलण्याची गरज आहे.”
चेतेश्वर पुजाराच्या ‘स्ट्राइक रेट’ बद्दलची चर्चा थांबली पाहिजे, अशी वीरेंद्र सेहवागची इच्छा आहे. तो पुढे म्हणाला “कसोटी क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट कधीही महत्त्वाचा नसतो. जेव्हा मी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळायचो तेव्हा राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण माझ्यापाठोपाठ फलंदाजीला येत असत. हे सर्व कसोटी सामन्यात जवळपास 50 च्या स्ट्राइक रेटने खेळले, जे पूर्णपणे ठीक आहे.”
महत्वाच्या बातम्या
व्हिडिओ: WTC फायनलसाठी कोहलीची ‘विराट’ तयारी, ‘या’ फटक्यांचा करतोय खास सराव
चूकीला माफी नाही! भर सामन्यात पंचांशी पंगा आणि स्टंप उखडणे आले शाकिबच्या अंगाशी, झाली ‘मोठी’ कारवाई