येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. साउथॅम्प्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. अनेक दिग्गज खेळाडू या सामन्याबद्दल आपल्या प्रतिक्रीया देत आहे. यात आता आणखी एका दिग्गज खेळाडूची भर पडली आहे.
भारतीय संघासाठी ११६ कसोटी सामने आणि १२९ वनडे सामने खेळलेले माजी भारतीय कर्णधार आणि निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनी क्रिकेटनेक्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “भारतीय संघ चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. हा संघ इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करेल.”
ज्यावेळी दिलीप वेंगसरकर निवड समितीचे चेअरमन होते, त्यावेळी, राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडमध्ये १-० ने मालिका आपल्या नावावर केली होती. त्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पुढील तीन दौऱ्यात अनुक्रमे ०-४, १-३ आणि १-४ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
जेव्हा वेंगसकर यांना विचारण्यात आले की भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. याबाबत तुमचे मत काय? यावर उत्तर देत ते म्हणाले की, “भारतीय संघासाठी हा एक मोठा हंगाम आहे. बायो बबलमध्ये राहणे खूप कठीण आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु इंग्लंडमध्ये इंग्लंड संघ एक मोठे आव्हान आहे. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आशा करतो की, हा संघ चांगली कामगिरी करेल.”
न्यूझीलंड संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामने खेळण्याचा फायदा मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर देत ते म्हणाले, “नक्कीच अंतिम सामन्यापूर्वी त्यांना इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामने खेळायचे आहे. याचा त्यांना नक्की फायदा होईल. अंतिम सामना हा इंग्लंडमध्ये त्यांचा तिसरा कसोटी सामना असेल. तर आपचा पहिलाच सामना असेल. ”
तसेच ते पुढे म्हणाले की, “परिस्थिती अनुसार स्वतःमध्ये बदल करावे लागतील. यापूर्वी आपल्याला खूप फायदा मिळायचा कारण मालिका सुरू होण्यापूर्वी आणि मालिका सुरू असताना आम्हाला काउंटी सामने खेळण्याची संधी मिळायची. त्यामुळे आम्हाला परिस्थिती अनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची संधी मिळायची. मला या दौऱ्याबाबत फारसं काही माहीत नाही, परंतु आशा करतो की त्यांना या सामन्यापूर्वी काही सामने खेळायला मिळतील.”
तसेच विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माबद्दल बोलताना ते म्हणाले की, “रोहित शर्मा देखील संघात आहे. भारतीय संघाकडे उत्कृष्ट फलंदाज आहेत. जर ते आपल्या क्षमतेनुसार खेळले तर मला विश्वास आहे की, तर ते चांगली कामगिरी करतील. ”
तसेच शेवटी ते म्हणाले की, “भारतीय संघाकडे उत्कृष्ट फलंदाजांसह उत्कृष्ट गोलंदाज देखील आहेत. त्यामुळे भारतीय संघाकडे ही मालिका जिंकण्याची उत्तम संधी आहे. इंग्लंडमध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका प्रमुख असते, यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संतुलन राहते. नाहीतर तुम्हाला ६ फलंदाज आणि ४ गोलंदाजांसोबत खेळावे लागते. अशातच एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाली तर दिवसभरात ९० षटक गोलंदाजी करणे कठीण होऊन जाते. मला हार्दिक पंड्याबद्दल काही माहीत नाही कारण मी त्याला गोलंदाजी करताना पाहिलं नाही.”
हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने फार क्वचित गोलंदाजी केली आहे. याचाच फटका त्याला सध्या बसत आहे. त्याला या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही, यामागे तो गोलंदाजी जास्त करु शकत नसल्याचे मोठे कारण असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ ट्विटरकर्ता गेल्या १० वर्षांपासून विराट कोहलीला देतोय त्रास; काय आहे नेमकं कारण, घ्या जाणून
भारतीय संघाला बसणार फटका? ‘या’ दिग्गज गोलंदाजाला कोरोनाची लक्षणे; रिपोर्ट्सची प्रतिक्षा
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक