ऑस्ट्रेलियन संघाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी २००५ ते २००७ या काळात भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम केले होते. मात्र प्रशिक्षक म्हणून त्यांची कामगिरी वादग्रस्त ठरली होती. विशेषतः भारतीय कर्णधार सौरव गांगुलीसह झालेल्या वादांची चर्चा क्रिकेट वर्तुळात चांगलीच रंगली होती. गांगुली हा भारतीय संघाचा एक सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. मात्र चॅपेल प्रशिक्षक असताना त्यांनी गांगुलीला केवळ कर्णधारपदच सोडायला लावले नाही तर जवळपास दीड वर्ष त्याला संघातून देखील बाहेर ठेवले.
आता पुन्हा एकदा चॅपेल यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी गांगुलीवर एक नवीनच आरोप केला आहे. ज्यानुसार गांगुलीला खेळाडू म्हणून आपल्या खेळत सुधारणा करण्यात रस नव्हता, तर केवळ कर्णधार होऊन संघाचा ताबा आपल्या हाती ठेवण्यातच रस होता.
गांगुलीवर केले आरोप
चॅपेल यांनी एका कार्यक्रमात बोलतांना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “गांगुली ज्यावेळी कर्णधार होता त्यावेळी अनेक समस्या जाणवत होत्या. एकतर त्याला अजिबात मेहनत करायची नव्हती. तो आपल्या खेळत सुधारणा करण्यासाठी उत्सुक नव्हता. त्याला केवळ संघाचा कर्णधार होण्यातच अधिक रस होता. ज्यामुळे त्याला संघातील गोष्टींवर आपले नियंत्रण ठेवता आले असते.”
चॅपेल यांना विशेषकरून २००७ सालच्या वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले होते. मात्र या वर्ल्डकप मध्ये भारतीय संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. प्राथमिक फेरीतच भारताला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. चॅपेल यांनी भारतीय संघात केलेले विविध प्रयोग अपयशी ठरल्याचेच हे द्योतक होते.
याबाबत बोलताना चॅपेल म्हणाले, “भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम केलेले दोन वर्ष अतिशय आव्हानात्मक होते. तिथे प्रत्येक पावलावर नवीन आव्हाने होती. भारतीय लोकांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या. आणि ते क्रिकेटबाबत अतिशय कट्टर देखील होते. भारतीय संघ २००७ च्या वर्ल्डकप मध्ये अपयशी ठरला होता. मात्र तरीही बीसीसीआयने मला पुन्हा प्रशिक्षकपद सांभाळण्याची देखील ऑफर दिली होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
INDvNZ: विराटचा भिडू भारतीय फलंदाजांसाठी ठरणार कर्दनकाळ, अवघ्या ६ कसोटीत घेतल्यात ३६ विकेट्स
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा वार्षिक करार जाहीर, नव्या गुणांकन पद्धतीसह तब्बल ८ खेळाडूंना डच्चू