मुंबई । पाकिस्तानी गोलंदाज आणि भारतीय फलंदाज यांच्यामधील मैदानावरील युद्धाचा इतिहास जुना आहे. वकार युनूस, वसीम अक्रम आणि शोएब अख्तरचे तोफेच्या वेगाने येणारे चेंडू सचिन, अझरुद्दीन, नवज्योतसिंग सिद्धू, सौरव गांगुली यांना अनेकदा चकविले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि भारतीय फलंदाज यांच्यात 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि नंतर 2000 च्या दशकातही जोरदार टक्कर पाहायला मिळाली.
कधीकधी भारतीय फलंदाज अख्तरवर वर्चस्व गाजवायचे तर कधी शोएब भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल करायचा. ही स्पर्धा वर्षानुवर्षे टिकली. सचिन तेंडुलकर असो, सौरव गांगुली असोत किंवा वीरेंद्र सेहवाग असो, अख्तरने आपल्या धोकादायक गोलंदाजीने सर्वांना त्रास दिला होता. नुकतेच, आकाश चोप्राशी युट्यूबवरील संभाषणादरम्यान अख्तरने एमएस धोनीला जाणीवपूर्वक बीमर चेंडू टाकल्याचे सांगितले.
2006 मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौर्यावर होता. फैसलाबाद कसोटी सामन्यादरम्यान ही घटना घडली. धोनी क्रीजवर जोरदार फलंदाजी करीत होता. धोनीने अख्तरच्या एका षटकात तीन चौकार ठोकले आणि दडपणाखाली आणले. त्यानंतर पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी बीमरने धोनीला बाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू व्हाईड गेला.
शोएब म्हणाला की, “मी फैसलाबादमध्ये 8-9 षटके टाकली होती. मी वेगात गोलंदाजी करत होतो. धोनीने शतक झळकावले. मी मुद्दाम धोनीबरोबर बीमर टाकले आणि नंतर माफी मागितली. मी प्रथमच बीमरचा हेतुपुरस्सर वापर केला. मी तसे करायला नको होते. मला याची खंत आहे. खेळपट्टी संथ होती. तो चांगला खेळत होता. मी ज्या वेगाने गोलंदाजी करीत होतो, त्याच वेगाने तो फलंदाजी करीत होता.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात, धोनीने 148 धावांची खेळी करत आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्याच्या खेळीदरम्यान धोनीने 19 चौकार आणि 4 षटकार लगावले होते. तथापि हा कसोटी सामना अनिर्णीत राहिला.