भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन केले, पण तरीदेखील संघाच्या हातातील विजय निसटला. न्यूझीलंडच्या तळातील फलंदाजांनी शेवटचा विकेट टिकून ठेवला आणि सामना अनिर्णीत केला. भारतासाठी महत्वाची खेळी करणाऱ्यांमध्ये रविचंद्रन अश्विनचेही नाव आहे. त्याने या सामन्यात एकून सहा विकेट्स घेतल्या असून हरभजन सिंगचा एक खास विक्रमदेखील मोडला आहे. दरम्यान अश्विनने या सामन्यानंतर, एका फलंदाजापासून तो पुढे गोलंदाज असा झाला, याचा खुलासा केला आहे.
अश्विन या सामन्यात हरभजन सिंगला (४१७) मागे टाकत कसोटी क्रिकेटमधील भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. या सामन्यानंतर अश्विनने त्याच्या ४१९ कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. दरम्यान सामन्यानंतर बीसीसीआय टीव्हीसाठी श्रेयस अय्यरने अश्विनची मुलाखत घेतली. यावेळी अश्विनने तो फलंदाजापासून फिरकी गोलंदाज होण्यामागचा किस्सा सांगितला.
मुलाखतीत श्रेयसने अश्विनच्या प्रदर्शनाबाबत चर्चा केली. यावेळी अश्विन म्हणाला की, “हे फक्त आकडे आहेत, जे माझ्या प्रयत्नांमुळे मिळत आहेत. मी माझ्या खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला या गोष्टीची चिंता नाही की, मी किती विकेट्सच्या विक्रमाला पार करत आहे. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, आपण भारतासाठी खेळत आहोत. माझा २०० वा विकेट या मैदानावर होता आणि आता मी कानपूरमध्येच हरभजन सिंगला मागे टाकले.”
“जेव्हा हरभजन सिंगने २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत मालिकेत ऐतिहासिक गोलंदाजी केली होती. तेव्हा मी विचार केला नव्हता की एक दिवस मी ऑफ स्पिनर बनेल. मी त्यांच्याकडून प्रेरित झालो होतो आणि आज येथे आहे. खूप लोकांना ही गोष्ट माहिती असेल की, अगोदर मी एक फलंदाज होतो. पण २००१ च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर, मी स्पिन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे मी सुरुवात केली. पण मला माहीत नाही की, मी आताही हरभजनच्या स्टाइलला कॉपी करू शकतो की नाही.” असे अश्विन पुढे बोलताना म्हणाला.
Drawing inspiration ????
Achieving milestones ????
Revealing some cricketing stories ????@ShreyasIyer15 turns anchor as he interviews milestone man @ashwinravi99 post the first #INDvNZ Test.???????? – By @28anandFull interview ????️???? #TeamIndia @Paytm https://t.co/CLEn3lNzLF pic.twitter.com/SaLv1Jhfeb
— BCCI (@BCCI) November 30, 2021
कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवरील पहिला कसोटी सामना अनिर्णीत झाल्याबाबत अश्विन म्हणाला, “मी हळूहळू या गोष्टीचा स्वीकार करू लागलो आहे की, आम्ही कसोटी जिंकली नाहीय. आम्ही एवढ्या जवळ येऊनही विजयापासून लांब राहिलो. माझ्यासाठी यावर मात करणे थोडे कठीण आहे. यापूर्वी जमैकामध्ये असे झाले आहे. एका गोलंदाजाच्या रूपात मला यातून बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागेल.”
दरम्यान, भारताला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी शेवटच्या दिवशी ९ विकेट्स घेणे आवश्यक होते, पण गोलंदाज ८ विकेट्स घेऊ शकले आणि परिणामी सामना अनिर्णीत राहिला. न्यूझीलंडसाठी त्यांचे तळातील खेळाडू रचिन रवींद्र (१८) आणि एजाज पटेल (२) यांनी संयमी खेळीचे प्रदर्शन केले आणि संघासाठी शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिले. या दोघांच्या जोरावर न्यूझीलंडने शेवटच्या ५२ चेंडूत एकही विकेट गमवाला नाही आणि सामना अनिर्णीत केला.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखरचा ‘गब्बर’ स्टाईल डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर लावतोय आग, एकदा पाहाच