हार्दिक पांड्या आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळला नाही, कारण त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. आयपीएल 2024 मध्ये तीन वेळा मुंबई इंडियन्सने स्लो ओव्हर रेटने गोलंदाजी केली. यासाठी त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. तथापि, यंदाच्या आयपीएल हंगामातील दुसऱ्या सामन्यात तो संघात परतला आणि कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, या सामन्यातही त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तीच चूक पुन्हा केली, ज्यामुळे त्याला बंदीचा सामना करावा लागला होता. आता बीसीसीआयने कर्णधार हार्दिक पांड्याला लाखोंचा दंड ठोठावला.
शनिवारी, 29 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या अडचणीत सापडला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने अंतिम षटक नियोजित वेळेत सुरू केले नाही.
या विलंबाचा त्याला त्वरित फटका बसला, शेवटचे षटक टाकताना मुंबईला केवळ चार खेळाडूंना 30 यार्ड वर्तुळाबाहेर ठेवण्याची परवानगी होती. परिणामी, शेवटच्या षटकात महत्त्वपूर्ण धावा गेल्या आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
यावरूनच आयपीएलच्या आयोजकांनी कठोर निर्णय घेत, संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आयपीएलने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, हा हंगामातील मुंबई इंडियन्सचा पहिलाच स्लो ओव्हर रेट गुन्हा असल्यामुळे पांड्याला हा दंड आकारण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
यंदा आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेटच्या तीन गुन्ह्यांनंतरही कोणत्याही खेळाडूवर बंदी घालण्यात येणार नाही. यावेळी बीसीसीआयने डिमेरिट पॉइंट्स सिस्टीम लागू केली आहे. गेल्या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार एका महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर पडला होता. तर, हार्दिक पांड्याला मागील हंगामामुळे या हंगामात एका सामन्याच्या बंदीला सामोरे जावे लागले.






