भारतीय संघाला तीन ऑलिंपिक्स सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बलवीर सिंग (सिनीयर) यांची प्रकृती खालावली आहे. याची माहिती त्यांची नात कबीर यांनी दिली आहे.
त्यांना मोहाली येथील फोर्टिस हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
यावेळी कबीर म्हणाल्या, काल संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक खराब झाली. सध्या त्यांची परिस्थिती नाजूक आहे. त्यांना फोर्टिस हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते सध्या आयसीयुमध्ये आहेत.
९५ वर्षीय बलवीर सिंग यांना गेल्यावर्षी श्वसनाच्या त्रासामुळे एक आठवडा चंदीगढ येथील पीजीआयएमईआरमध्ये होते. आताही त्यांना गेले दोन तीन दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होत आहे. एकंदरीत त्यांची परिस्थीती अतिशय खराब आहे.
बलवीर सिंग यांनी १९४८मध्ये लंडन, १९५२मध्ये हेलसिंकी व १९५६मध्ये मेलबर्न ऑलिपिंक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवुन देताना मोठी भूमिका निभावली होती. १९५२मध्ये हेलसिंका ऑलिंपिक्समध्ये भारताने नेदरलॅंड्सला ६-१ने पराभूत केले होते. यात बलवीर सिंग यांनी ५ गोल केले होते. तो विक्रम आजही त्यांच्या नावावर कायम आहे. १९७५मध्ये विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय हाॅकी संघाचे ते मॅनेजर होते.